हरिसाल (अमरावती) : धारणी तालुक्यातील हरिसालपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम चौराकुंड ग्रामपंचायत अंतर्गत चोपन गावात अघोरी उपचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १ महिना ४ दिवसांच्या बालकाला गरम विळ्याने पोटाला चटके देण्यात आल्याचे समोर आले आहे. तीन दिवसांपासून शौच होत नसल्याने बालकास भूमकाकडे नेण्यात आले होते. तथाकथित उपचाराच्या नावाखाली भूमकाने बाळाला विळ्याने चटके दिले. दरम्यान, वैद्यकीय पथक गावात दाखल झाल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला.
चोपन हे गाव हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. १ सप्टेंबरला आरोग्य केंद्रातील डॉ. सांगवीकर व चमू नियमित क्षेत्रभेट अंतर्गत आठवड्यातून एकदा गावांची तपासणी करण्यासाठी गेली होती. चमूने चौराकुंड ग्रामपंचायतीतील गावांना भेटी दिल्या. नवजात, मुले, स्तनदा माता, गर्भवती स्त्रिया तसेच इतर रुग्णांची तसेच पिण्याच्या पाण्याची तपासणी करत असताना चमूचे एका बाळाकडे लक्ष गेले. अवघ्या १ महिना ४ दिवसांच्या या बाळाचे पोट फुगलेले होते. पोटावर काळे डाग व चट्टे होते. डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना विचारणा केली असता, त्याला तीन दिवसांपासून शौच होत नसल्याने आम्ही गावातील भूमकाकडे नेल्याचे त्यांनी सांगितले. भूमकाने गरम लोखंडी दरातीने बाळाच्या पोटावर डाग दिले; पण तरीही फरक पडला नाही, असे ते म्हणाले. हे ऐकताच वैद्यकीय पथकाने तत्काळ बाळाला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी हरणे यांनी प्राथमिक उपचार करून लगेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्याला रेफर केले.
अंधश्रद्धेच्या नावाखाली उपचार
आजही मेळघाटात अंधश्रद्धेच्या नावाखाली उपचार केले जात असल्यामुळे कुपोषण वाढत आहे आणि अनेक बालमृत्यू होत आहेत. एकाबाजूला शासन कोट्यवधी रुपये खर्च करून मेळघाटात आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामाणिकपणे कुपोषण व अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आपले कार्य करताना दिसत आहेत तरीही मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील गावांमध्ये आजही अंधश्रद्धेच्या नावाखाली भूमका, परिहार यांच्यामार्फत अघोरी उपचार केले जात आहेत.