राष्ट्रीयीकृत बँकांची १० कोटींनी फसवणूक
By Admin | Updated: March 19, 2016 00:12 IST2016-03-19T00:12:36+5:302016-03-19T00:12:36+5:30
बनावट दस्तऐवजांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणारे शहरात सक्रिय असून काही वर्षांत १० कोटीने राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची १० कोटींनी फसवणूक
बनावट दस्तऐवजांद्वारे कर्ज : आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
अमरावती : बनावट दस्तऐवजांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणारे शहरात सक्रिय असून काही वर्षांत १० कोटीने राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून पोलीस पसार आरोपीच्या शोधात आहे.
काही वर्षांत बँकेत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यामध्ये २०१२ मध्ये सैयद शारीख व सैय्यद तारीक या दोन आरोपींनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाची कोट्यवधीने फसवणूक केली होती. अल्युमिनीअम कारखाना काढण्याच्या नावाने दोघांनीही कंपनी उघडून बॅकेकडून कोट्यवधीचे कर्ज काढले होते. त्याकरिता बनावट दस्तऐवज सादर केले होते. या दोन्ही आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतरही काही घटना शहरात उघडकीस आल्या आहे. मार्च महिन्यात बुधवारा परिसरातील रहिवासी गजाजन कुळकर्णी, मंगेश उताणे, प्रदीप कळसकर व त्यांच्या पत्नीने एकाच संपत्तीचे दस्तऐवज विविध बँकांत गहाण ठेवून कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचे उघड झाले. यामध्ये कळसकर याने बडोदा बँकेत संपत्तीचे दस्तऐवज सादर करून १ कोटी ४० लाखांचे कर्ज काढले होते. ते दस्तऐवज हरविल्याची तक्रार राजापेठ ठाण्यात केली. त्यानंतर बनावट दस्तऐवजावरून इलाहाबाद बँकेतून ७० लाखांचे कर्ज उचलले. आरोपी कुळकर्णी याने गोमती फु्रट नावाने कंपनी उघडून ७ कोटी ५० लाखांचे अर्ज काढले. यामध्ये त्याने गणेश महादेव इंगळे याला भागीदार केले होते. त्याचप्रमाणे त्यांचे मित्र नितीन बुरंगे यालाही सहभागी केले होते. हे कर्ज काढताना आरोपींनी साक्षीदार म्हणून मिलिंद लोहकरे, उल्हास जोशी व चेतन जोशी यांनाही सहभागी केल्याचे पोलीस चौकशीत लक्षात आले आहे. गजानन कुळकणी याने नागपूर येथील बँकांनाही गंडा घातला आहे. हे सर्व फसवणुकीचे प्रकरणे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये घडले असून दस्तऐवजाची शहानिशा न केल्यामुळे बँकांना कोट्यवधीचा गंडा आरोपींने घातला आहे. सर्वसाधारण व्यक्तींना बॅकांतून कर्ज काढताना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना कर्ज देण्यासाठी विविध दस्ताऐवजाची मागणी केली जाते. पूर्तता न झाल्यास कर्जसुध्दा दिले जात नाहीत. मात्र, फसवणुक करणाऱ्यांनी बँकाना कोट्यवधीचा गंडा घातला तरीसुध्दा बॅकांच्या लक्षात आले नाही.