इराण-इराकमधून मागणी बंद; सोयाबीनचे भाव चारशे रुपयांनी घसरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 15:27 IST2019-03-02T15:27:14+5:302019-03-02T15:27:20+5:30
फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे.

इराण-इराकमधून मागणी बंद; सोयाबीनचे भाव चारशे रुपयांनी घसरले!
- संजय खांडेकर
अकोला:भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातून येणाऱ्या सोयाबीनवर प्रतिबंध घातला आहे. फेब्रुवारीपर्यंत इराण-इराक मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी भारताकडून करीत होते; मात्र २६ फेब्रुवारीनंतर हा तणाव अधिक वाढला. त्यामुळे सोयाबीनची खरेदी तूर्त थांबली आहे. सोयाबीनचे भाव प्रती क्विटंल चारशे रुपयांनी गडगडले आहे. सोयाबीनला अधिक चांगले भाव मिळण्याची अपेक्षा असताना अचानकसोयाबीनचे भाव कोसळल्याने देशभरातील कास्तकारांना कोट्यवधींचा आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या २० तारखेपर्यंत सोयाबीनला ३९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होते. आगामी काही दिवसांत ४५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची आस कास्तकारांना लागली होती. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन बाजारात आणले नव्हते. ही परिस्थिती असताना अचानक सोयाबीनच्या भावात घसरण सुरू झाली. सोयाबीनचे भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन थांबल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. तब्बल चारशे रुपयांनी सोयाबीनचे भाव घसरल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही सोयाबीनचा साठा आहे, त्या कास्तकारांनी आता मिळेल त्या भावात सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे.
‘एनसीडीईएक्स’कडे १३७७९४ टन साठा
नॅशनल कॉमोडिटी अॅण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडकडे देशभरातील गोदामांमध्ये १३७७९४ साठा आहे. अकोला- ४९१५७, इंदूर- १९८७५, कोटा-१८१०८, लातूर -५३७, मंदसौर-११७१७, नागपूर-४०१, सागर २३३८, शुजालपूर-१४८०११, आणि विशादा २०८५० असा एकूण १३७७९४ टन साठा पडून आहे. सोयाबीनचे भाव वाढतील म्हणून हा साठा करण्यात आला होता; मात्र या साठ्यांमुळे आता कोट्यवधींचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये गत काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्यामुळे इराण-इराकने भारतातील सोयाबीनची खरेदी थांबविली. भारतात सोयाबीनला फारशी मागणी नाही. मार्चअखेर आर्थिक वर्ष असल्याने व्यापारी वर्ग सोयाबीन खरेदीच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, सोयाबीनचे भाव पडले आहे.
-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.