शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून; घर खर्च, पीक कर्ज भरणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:56 IST2020-03-28T13:56:21+5:302020-03-28T13:56:28+5:30
शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच पडून; घर खर्च, पीक कर्ज भरणे झाले कठीण
अकोला: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये, त्यातून हा प्रसार वाढू नये, यासाठीची काळजी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तंूची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे; पण शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला असून, घर खर्च आणि पीक कर्ज भरण्याचे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.
गतवर्षी पावसाच्या अनिश्चिततेचा फटका सुरुवातीला मूग, उडीद पिकाला बसल्याने या दोन्ही पिकांचे उत्पादन घटले. सोयाबीन, कापूस पिकाला अति पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचा उतारा घटला. सतत पाऊस सुरू राहिल्याने कापसाची प्रतही घटली. ही झीज भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा पिकांची पेरणी केली; परंतु पेरणीला उशीर झाल्याने हरभºयाचे उत्पादन घटले. अवकाळी पावसाचाही फटका बसला. परिणामी, गहू, भाजीपाला, फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यातून शेतकºयांची आर्थिक घडी सुधारणे अशक्य असतानाच, कोरोनारू पी नवीन संकटाने जगालाच वेठीस धरले आहे. परिणामी, शासनाला कठोर पावले उचलावी लागत असून, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २१ मार्चपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. तोपर्यंत हरभरा ३,५०० आणि तूर सरासरी ३,५०० क्ंिवटल आवक सुरू होती. तसेच सोयाबीनची आवक ही १५० क्ंिवटलवर होती. तथापि, आजमितीस सर्व शासकीय शेतमाल खरेदी केंद्र बंद आहेत. बाजार समित्यांमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, धान्याचे व्यवहार सुरू आहेत. सध्या गहू, हरभरा काढणी सुरू असून, तूरही शेतकºयांकडे पडून आहे; परंतु शासकीय खरेदी केंद्र सुरू नसून, बाजार समित्यांमध्येही खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. येथे केवळ धान्य, डाळी, कांदा आणि बटाटा विक्री सुरू आहे. हरभरा खरेदीसाठीचे शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने हक्काची बाजार समिती शेतकºयांचा आधार आहे. तथापि, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आवश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद ठेवला आहे.
कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठीच संचारबंदी लावली आहे. बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले आहेत. जीवनावश्यक वस्तू, धान्य, कांदा आणि बटाटा विक्रीचे व्यवहार सुरू आहेत; पण लोकांनी गर्दी करू नये.
- शिरीश धोत्रे,
सभापती,
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.