विवेक चांदूरकर /वाशिम:तीन वर्षांपासूनचा दुष्काळ आणि शेतमालाला मिळणारे अल्प भाव यामुळे संकटात सापडलेल्या वर्हाडातील अकरा शेतकर्यांनी हर्षोउल्हासाचा समजल्या जाणार्या दिवाळी सणाच्या तोंडावर मृत्यूला कवटाळले. प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीला या शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र अंधार आहे. या सर्व आत्महत्या एक ते नऊ नोव्हेंबरदरम्यान झाल्या. वर्हाडात गत तीन वर्षांपासून दुष्काळ असून, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती पार कोलमडली आहे. सण, उत्सव साजरे करणे तर दूरच त्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असल्याचे विदारक चित्र आहे. घरी शेती असल्यामुळे दारिद्रय़ रेषेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि शेतीतून एक पैसाही उत्पादन होत नाही. निसर्ग सतत धोका देत असल्याने बळीराजा खचून गेला आहे. दिवाळी सणाच्या पृष्ठभूमिवर आपल्या घरातील दारिद्रय़ाचा अंधार, मुलाबाळांचे फाटलेले कपडे, कुटंबाच्या गरजाही आपण पूर्ण शकत नसल्याचे शल्य त्याला बोचत आहे. हे दु:ख सहन न झाल्यानेच गत आठवड्यात वाशिम, अकोला जिल्ह्यात प्रत्येकी पाच तर बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकर्याने या जगातून कायमचा निरोप घेतला.
*यांनी संपविले जीवन..
१) गणेश दुकळे, चिखली, जि. बुलडाणा,२) प्रल्हाद नामदेव गायकवाड (वय ६0) मंगरुळपीर, जि. वाशिम.३) बंडू गोदमले, ढोणी, ता. मानोरा, जि. वाशिम,४) श्रीराम गोविंदराव खिराडे (६0) धनज बु. ता. कारंजा, जि. वाशिम. ५) नामदेव बल्लाळ, गोस्ता, ता. मानोरा, जि. वाशिम.६) अरविंद खडसे मेंद्रा ता. मानोरा, जि. वाशिम ७) संदीप कावरे, भटोरी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला.८) शंकर राजाराम कुरवाडे, हिवरा बोर्डे, जि. अकोला.९) रोहणा येथील मुळे, १0) निंबा येथील एका शेतकर्याचा समावेश आहे. ११)गंगुबाई प्रल्हाद वायकर तेल्हारा,जि.अकोला.