जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल सवलतीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:38+5:302021-02-05T06:18:38+5:30
अकोला : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजना व मदतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत दोन हजार कोटी ...

जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल सवलतीचा लाभ
अकोला : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजना व मदतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा निधी पोहोचला आहे. ऊर्जा विभागाने जाहीर केलेल्या कृषिपंप वीज जोडणी धोरणाचा गौरवपूर्ण उल्लेख करून पालकमंत्री म्हणाले की, याद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपयांच्या वीजबिल सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनाचा अकोला जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ येथील शास्त्री स्टेडियममध्ये पार पडला. या सोहळ्यास संबाेधीत करताना ते बाेलत हाेते. यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, प्रांताधिकारी डॉ. नीलेश अपार, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तसेच सर्व अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय, शहिदांचे कुटुंबीय तसेच नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकार उपस्थित होते. या समारंभातील पोलीस दलाच्या संचलनाचे नेतृत्त्व परेड कमांडर सचिन कदम यांनी केले. तर सेकंड कमांडर एस. एस. गुलसुंदरे हे होते. आशिष लव्हंगळे, सुरेंद्र राऊत, सागर फेरण, जावेद तडवी, प्रेम दामोदर, श्रीमती मनीषा तायडे हे प्लाटून कमांडर होते. प्रकाश नावकार हे बॅन्ड मेजर होते. त्यांच्या वाद्यवृंद पथकाने शानदार वाद्यसंगीत सादर केले.
मुख्य समारंभानंतर ना. कडू यांनी सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय, शहिदांचे कुटुंबीय यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पोलीस दलात दाखल २९ मोटारसायकलींचे वितरणही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा पुरस्कारांचे वितरण
ना. कडू यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला)- कु. गौरी यशवंत जयसिंगपुरे (बॉक्सिंग), गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष)- रोहन संजय पटेकर (बॉक्सिंग), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार- शाकीर अली खान पठाण गुलाम नबी खान पठाण (बॉक्सिंग) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.