संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तयार होणार कृती आराखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 14:28 IST2018-09-30T14:28:20+5:302018-09-30T14:28:32+5:30

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.

Action plan to be prepared for potentially water scarcity-hit villages! | संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तयार होणार कृती आराखडे!

संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तयार होणार कृती आराखडे!

- संतोष येलकर
अकोला : संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता उपाययोजनांचा आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश २८ सप्टेंबर रोजी शासनामार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.
राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला, तरी काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने राज्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांसासाठी २०१८-१९ या वर्षाकरिता संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २८ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.

टंचाईत लाभ होणाºया उपाययोजना प्रस्तावित करा!
पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करताना पाणीटंचाईच्या कालावधीतच लाभ होऊ शकेल, अशा कमी खर्चाच्या उपाययोजना पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात येतील, यासंदर्भात जाणीवपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचनाही शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या.


तातडीच्या उपाययोजनांसाठी खर्च, वेळेचा विचार करावा!
संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना ठरविताना त्यासाठी होणारा खर्च, भविष्यात होणारा फायदा तसेच उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारा वेळ या बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या.

कार्यक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करा!
पाणीटंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी मागणी करतील, त्यावेळी पूर्णपणे कायक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासन परिपत्रकानुसार संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना देण्यात आले.

 

Web Title: Action plan to be prepared for potentially water scarcity-hit villages!