जामखेडला बारा दिवसाआड पाणी; भुतवडा तलावाने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 12:18 PM2020-05-08T12:18:21+5:302020-05-08T12:18:56+5:30
जामखेड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.
अशोक निमोणकर ।
जामखेड : शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलावाने तळ गाठला आहे. त्यात अवघे तीन टक्के पाणी शिल्लक आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेने पाच वीजपंप बसवून खड्ड्यातील पाणी उपसा सुरू केला आहे. यामुळे शहर व वाड्यावस्तीसाठी १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होईल.
भुतवडा तलावातून शहराला पाणीपुरवठा तीन महिन्यांपासून दहा दिवसाआड केला जात आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस तलावातील पाण्याला डबक्याचे स्वरूप आले. त्यामुळे पाणी पुरवठा करणाºया चारीच्याही खाली पाणी गेले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद पडला होता.
मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तातडीने कर्मचाºयांच्या ताफ्यासह भुतवडा तलावावर जाऊन तेथील पाहणी केली. खड्ड्यातील पाणी चारीत टाकण्यासाठी पाच अश्वशक्तीचे तीन पंप व साडेसात अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले. महावितरण अधिकारी, कर्मचारी यांना बोलावून रोहित्रातून वीज कनेक्शन घेऊन सिंगल फेजवर तीन वीजपंप दिवसरात्र चालू राहतील. दोन वीजपंप शेतीसाठी असणाºया वीजवाहक तारेवर टाकून बारा तास वीजपंप चालू राहील, असे नियोजन केले.
मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणा-या पाच वीजपंप व १०० मीटर पाईप जप्त केला. येथील अवैध पाणी उपशाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्या वृत्ताची दखल घेत जगताप यांनी कारवाई करून तातडीने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत केला.