शिर्डी - खराब हवामान आणि धुक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विमानसेवा ठप्प आहे. पाच दिवस साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली आहे. शिर्डीतून विमानसेवा रद्द ठेवण्यात आल्याने भाविकांचे खूप हाल झाले आहेत. शिर्डी विमानळावरून मुंबई, इंदोर, भोपाळ, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरातून दिवसभरात 28 विमानांचे टेकऑफ व लँडीग होत असते. 28 विमानांमधून दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे.
शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज 28 विमानांची ये-जा असते. गुरूवारी खराब व ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावरील सर्व विमानांचं लँडींग आणि टेकऑफ रद्द करण्यात आल्याची माहिती शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे संचालक दीपक शात्री यांनी दिली होती. मात्र विमानसेवा बंद असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. विशेष म्हणजे विमान कंपन्या प्रवाशांना आगाऊ सूचना देत नसल्याने भाविकांच्या मनस्तापात भर पडत आहे.
धुके व ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने विमाने माघारी नेण्यात येत आहेत. सलग पाच दिवस विमानसेवा बंद राहिल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व शिर्डी विमानतळ प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच अशा प्रकारची मोठी अडचण आली आहे. यामुळे रन-वे वर लाईट बसविण्याची व नाईट लँडींग सुविधा सुरू करण्याची गरज आहे. सध्या शिर्डी विमानळावरून स्पाईस जेट, इंडियन एअरलाईन्स, इंडिगो आदी विमान कंपन्यांची मुंबई, इंदोर, भोपाळ, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.
नाईट लँडींग सुविधा नाही
रन-वे वरील व्हिजिबीलीटी वाढण्यासाठी काही दिवसांपूर्वी अधिक क्षमतेची अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात किंवा पावसाळ्यातही खराब हवामानाचा इतका फटका बसला नव्हता. पण सध्याच्या कमी ढगाळ वातावरणातही व्हिजिबीलीटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या अडचणी कमी होतील, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.