ऊस तोडीवरून रंगला राजकीय कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:01+5:302021-03-06T04:21:01+5:30
सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिल्याने सोशल ...
सोनई : मुळा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिल्याने सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा होऊ लागली आहे. ऊस पेटवून देणारा शेतकरीही एका पक्षाचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथील वसंत शेटे यांनी स्वत:चा ऊस पेटवून दिला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्र्यांच्या प्रतिमेचेही दहन केले. त्यानंतर सोशल मीडियावर राजकीय कलगीतुरा रंगला. शेतकऱ्याने अडीच एकर उसापैकी २० गुंठे ऊस पेटवून दिला. उर्वरित उसात आधीच पाणी सोडून दिले, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. याबाबत दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत.
मुळा कारखान्याच्या लाभ क्षेत्रात १६ हजार ४९३ हेक्टरवर नोंद असून, जवळपास १४ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. ९ लाख गाळप झाले आहे. ज्यांनी नोंदी दिल्या आहेत, अशा सर्वांचा ऊस आम्ही तोडणार आहोत, असे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.
----
एका पक्षाच्या कार्यकर्त्याने पुढील वर्षाची नोंद दिली होती. तारीख चुकली, हे त्यांच्या लक्षात आणून दिले, तरीही त्यांनी दुरुस्ती करून दिली नाही. त्यांचा ऊस बिगर नोंदीचा असूनही आम्ही तो घेऊन जाणार होतो. कारखान्याचा ऊस तोडीचा प्रोग्रॅम १ ते १० नोव्हेंबरचा सुरू आहे. मध्येच कुणाचा ऊस तोडला, तर नोंदी दिलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो. हा राजकीय स्टंट असूनही कारखान्याची बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाणार आहे.
- शरद बेल्हेकर,
कार्यकारी संचालक, मुळा कारखाना
----
एकतर नोंद नाही. नियमानुसार त्यांचा ऊस तोडला जाऊ शकत नाही, हे त्यांना माहीत आहे. परंतु, त्यांना फक्त स्टंट करायचा आहे. सर्वांचा ऊस आम्ही तोडणार आहोत, पण जो प्रोग्रॅम चालू आहे, त्याच्यात बदल केल्यास नोंदी दिलेल्या हजारो शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत.
- नानासाहेब तुवर,
अध्यक्ष, मुळा कारखाना
---
मुळा कारखाना आमच्यावर अन्याय करत असून, मी महाविकास आघाडी व मंत्र्यांचा निषेध करत आहे. याबाबत कुठलाही अधिकारी सकारात्मक चर्चा करत नसून याचा निषेध म्हणून ऊस पेटून देत आहे.
-ऋषिकेश शेटे,
शेतकरी