कृषी दिनाच्या कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांची दांडी
By admin | Published: July 2, 2014 12:35 AM2014-07-02T00:35:23+5:302014-07-02T00:35:23+5:30
अहमदनगर : कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित कृषी दिनाचा कार्यक्रम अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्षा मोनिका राजळे, सभापती हर्षदा काकडे आणि कै लास वाकचौरे यांच्या गैरहजेरीत पार पडला. नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी सभापती बाबासाहेब तांबे यांना भुषवावे लागले.
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषदेतही कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती. मात्र, नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम उशिरा सुरू झाला.
पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हजर राहावे लागले. त्याचा परिणाम कृषी विभागाच्या कार्यक्रमावर झाला. दरम्यान, तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती दिली. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष घटक आणि जिल्हा परिषदेच्या योजनेतून शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप करण्यात आले.