तुम्ही निवडून द्या, आम्ही पाऊस पाडतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:14+5:302021-01-15T04:18:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करंजी (जि. अहमदनगर) : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध ...

तुम्ही निवडून द्या, आम्ही पाऊस पाडतो !
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजी (जि. अहमदनगर) : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रकारच्या युक्त्या लढविल्या जात असून, अनेक प्रकारचे आश्वासने दिली जात आहेत. पाथर्डी तालुक्यातील शिरापूर-करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तर एका पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात चक्क पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरापूर-करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. यावर्षी दोन पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एका पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळ पडला तर चक्क पाऊस पाडण्याचेच आश्वासन दिले आहे.
या पॅनलने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, मतदारांनी ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता आमच्याकडे दिल्यास भविष्यात या भागात दुष्काळ पडला तर पावसाळी मोसमात चार महिन्यांत दोन सप्ताह, हरिभक्ती यज्ञ व वरुण अस्त्राचा सिद्ध प्रयोग करून पाऊस पाडला जाईल. याची पूर्ण जबाबदारी वॉर्ड क्र.१चे उमेदवार घेतील, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अशा पद्धतीने पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांच्या या जाहीरनाम्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. निवडणुकीत अनेक प्रकारची आश्वासने पाहायला व ऐकायला मिळतात. मात्र, यज्ञ करून पाऊस पाडण्याचे मतदारांना दिलेले हे आश्वासन जिल्ह्यातील आगळेवेगळे ठरले आहे.
....................
आमचा भाग दुष्काळी आहे. यज्ञ करून आम्ही दरवर्षी पावसाला साद घालतो. मी नाथभक्त आहे. यज्ञ-हवन केल्यानंतर पाऊस पडतो, अशी आमची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीत पावसासाठी यज्ञ करून पाऊस पाडू, असे आश्वासन दिले आहे.
-मनोज कराड, पॅनल प्रमुख, शिरापूर-करजवाडी ग्रामपंचायत