तुम्ही माझ्याबरोबर सूडबुद्धीने वागत आहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:19+5:302021-01-15T04:18:19+5:30
पारनेर : देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या सरकारने मला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. मी पाचवेळा आपल्याला पत्र ...

तुम्ही माझ्याबरोबर सूडबुद्धीने वागत आहात
पारनेर : देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्या सरकारने मला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. मी पाचवेळा आपल्याला पत्र लिहिले. त्याचे उत्तरही दिले नाही. तुम्ही माझ्याबरोबर सूडबुद्धीने वागत आहात काय? असा प्रश्न करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अण्णा हजारे यांनी दिल्लीत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतमालाला हमीभाव दिला जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिल्ली व राळेगणसिद्धीमधील आंदोलनात कृषिमंत्री राधामोहन सिंह, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडलेल्या उपोषणवेळी देण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळत नसल्याने ते आत्महत्या करीत आहेत. टोमॅटो, दूध, फळे यांना हमीभाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि वाढीव ५० टक्के खर्च दिला पाहिजे ही आपली मागणी आहे. मी यासाठी दिल्लीत आंदोलन करणार आहे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.
-----
संसदेतील व्हिडिओ तुम्हाला पाठवितो..
२०११ मध्ये आंदोलनावेळी संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपच्या प्रमुख ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी माझ्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यांची भाषणे आपल्याला कळावीत म्हणून तो व्हिडिओ आपल्याला पाठवतो, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.