केंद्राने लस दिली तरच वेगाने लसीकरण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:32+5:302021-07-08T04:15:32+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहीम राबविता येत नाही. ...

केंद्राने लस दिली तरच वेगाने लसीकरण होईल
अहमदनगर : केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहीम राबविता येत नाही. प्राप्त लसीचे योग्य नियोजन करुन शक्य तितक्या वेगाने लसीकरण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि पीक पाण्याचा आढावा पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना या बैठकीची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात ९ लाख ९५ हजार ५८९ व्यक्तींनी लसीची मात्रा घेतली आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ८ लाख १९ हजार २७० आणि कोवॅक्सिनचे १ लाख ९० हजार २६० असे एकूण १० लाख ९ हजार ५३० डोस प्राप्त झाले होते. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच पुरेशा ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे आणि बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट कमी कमी होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा दर केवळ ३.३७ टक्के इतका खाली आला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर आपण कोरोनाला रोखू शकतो.
जिल्ह्यात नव्याने १४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी ७६ मेट्रिक टन इतकी होती. त्याच्या तीन पट (२२८ मे. टन) मागणीची आवश्यकता गृहित धरुन ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पीक पेरणीचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि पुरेसा पाऊस पडेल, अशी आशा करु या. पाऊस आठवडाभर लांबला तर मूग आणि उडदाची दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
-------
----------
जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्रीचा शुभारंभ
येथील जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्रीचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. ती बुधवारपासून कार्यान्वित करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.
--
फोटो-०७ पालकमंत्री