भागवतवाडीतील अपघातात दोन युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:15+5:302021-03-01T04:25:15+5:30
तळेगाव दिघे : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघेमार्गे असलेल्या भागवतवाडी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या ...

भागवतवाडीतील अपघातात दोन युवक जागीच ठार
तळेगाव दिघे : संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघेमार्गे असलेल्या भागवतवाडी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाले. ही घटना रविवारी (दि. २८) सायंकाळी ५.१० च्या सुमारास घडली.
गोकूळ राजेंद्र माळी (वय २१) व आशुतोष नानासाहेब बोरसे (वय २२, दोघेही रा. लोणी, ता. राहाता) अशी मृत युवकांची नावे आहेत.
संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने गोकुळ राजेंद्र माळी, आशुतोष नानासाहेब बोरसे हे दोघे युवक दुचाकीवरून (क्र. एमएच १७ सीके ९१८६) कोपरगावहून तळेगाव दिघेच्या दिशेने जात होते. कोपरगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गोकुळ माळी व आशुतोष बोरसे या युवकांना जबर मार लागून दोघेही जागीच ठार झाले. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला. अज्ञात वाहन टेम्पो होते. त्याचा क्रमांक काही युवकांनी लिहून घेतला आहे. युवक कार्यकर्ते दीपक भागवत व शरद भागवत यांनी यावेळी मदतकार्य केले. घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे पाठविला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी अपघाताच्या घटनेचा व अपघातास कारणीभूत वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.