मिरवणुकीत डीजेच्या वाहनाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
By शेखर पानसरे | Updated: January 4, 2024 21:46 IST2024-01-04T21:46:04+5:302024-01-04T21:46:41+5:30
विवाह सोहळ्यासाठी जात होता नवरदेव ; सहा जणांना दुखापत, जखमींवर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मिरवणुकीत डीजेच्या वाहनाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
संगमनेर : साखरपुडा, हळद आणि विवाह सोहळ्यासाठी त्याच्या गावातून नवरदेव जात असताना मिरवणूक सुरू होती, त्यावेळी तेथे डीजे वाजत होता. डीजे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या वाहनाखाली मिरवणुकीला उपस्थित असलेले काही चिरडले गेले, काहींना वाहनाचा धक्का लागला. यात दोघांचा मृत्यू झाला. सहा जणांना दुखापत झाली आहे. त्यांच्यातील काहींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (दि.०४) दुपारी ४.३० सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात घडली.
बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८), भास्कर राधू खताळ (वय ७३) अशी मयतांची नावे आहेत. अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२), रामनाथ दशरथ काळे (वय ६५), गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान राबवा खताळ, भारत भागा खताळ, सागर शंकर खताळ अशी (सर्व रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे-पाटील, पोलिस हेड कॉस्टेबल अमित महाजन हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे.