शिर्डीमधून तीन विद्यार्थ्यांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:04 IST2019-03-15T17:58:58+5:302019-03-15T18:04:29+5:30
शहरातील आदर्श विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या तिघा विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे.

शिर्डीमधून तीन विद्यार्थ्यांचे अपहरण
शिर्डी : शहरातील आदर्श विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या तिघा विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
संकेत राजेंद्र वीर (वय-१३, रा. संभाजीनगर), साई भारत बाविस्कर(वय -१३, रा. गणेशवाडी) आणि सोनू नवनाथ कुलथे (वय-१५, रा. विरभद्र कॉलनी) या तिघांचे अपहरण झाले आहे. हे तिघे मित्र असून आदर्श विद्यालयामध्ये नववीत शिकतात. काल(गुरुवारी) सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे तिघेही शाळेत गेले होते. मात्र सायंकाळी ते घरी परतले नाहीत. पालकांनी शोध घेतला असता ते कोठेही आढळले नाहीत. दरम्यान याप्रकरणी आज (शुक्रवारी) राजेंद्र भागवत वीर (वय-४८) यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.