अशोक निमोणकर
जामखेड : जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. तिघेजण लघुशंका करत असताना येथे लघवी करू नका महिला आहेत असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांंनी तरुणास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तरुण व त्याच्यासोबत असलेल्यांवर गोळीबार केला. यामध्ये एकाच्या पायाला गोळी लागली असून त्याला अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवले आहे.
याबाबत जामखेड पोलीसात आदित्य बबन पोकळे (वय २०, वर्षे धंदा, वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली. रविवारी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ पोकळे वस्तीवरील नागरिक व महिला बसल्या होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले आणि तिथे लघवी करू लागले. त्यांना आदित्य पोकळे याने येथे लघवी करू नका महिला बसल्या आहेत असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी आदित्यला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तिथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला. यावेळी तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला.
कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून अहिल्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
गोळीबार झाल्याचे समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. सदर गुन्ह्यात वापरलेल्या कारच्या नंबरवरून पोलीसांनी शोध सुरु केला असून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहे.
रोहित पवार यांची टीका
या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर कारवाईची मागणी केली आहे. "मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत रहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं, ही विनंती," असं रोहित पवार यांनी म्हटलं.