सहा हजार हेक्टरवर पेरणी
By Admin | Updated: March 3, 2023 15:53 IST2014-05-08T01:00:23+5:302023-03-03T15:53:07+5:30
अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे.

सहा हजार हेक्टरवर पेरणी
अहमदनगर : खरीप हंगामासाठी ६ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. या हंगामासाठी २ लाख ५५ हजार ४०० मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. बाजरी, भात, मका, कडधान्य, तेलबिया, सोयाबीन, कापूस (पाकीट) आदींच्या बियाणांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आगामी खरीप हंगामात शेतकर्यांना बी-बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाने आवश्यक तो समन्वय राखावा, म्हणजे खरीप हंगाम यशस्वी होण्यास मदत होईल, अशी आशा जिल्हाधिकारी कवडे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक शिरीष जाधव, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजी आमले आदींसह राजेश परजणे व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता, शेतकर्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये. कृषी निविष्ठा उपलब्धतेबाबत शेतकर्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये, खते कधी आणि केव्हा उपलब्ध होतील याची माहिती शेतकर्यांना द्यावी. वितरण करताना कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याची पूर्वकल्पना देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच ५९२ मि.मी. पाऊस झालेला असला तरी आगामी अंदाजानुसार सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीबाबत शेतकर्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, पिकांबाबात आकस्मिक योजना तयार हवी. पीक पद्धतीत बदलाबाबत जिल्हास्तरावर कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कवडे यांनी दिले. कृषी निविष्ठा कृषी निविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर ६ गुणनियंत्रण निरीक्षक, उपविभागस्तरावर ८, तालुकास्तरावर २८ असे एकूण ४२ निरीक्षक आहेत. जिल्ह्यात परवानाधारक बियाणे वितरक १ हजार ८१६, खते वितरक १ हजार ८७७ तर किटकनाशके वितरक १ हजार ८८१ आहेत.