सचिन वराळ, मंगेश वराळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:20+5:302021-03-01T04:25:20+5:30
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील सरपंच पदाची निवडणूक असताना दोन दिवस आधी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भागाजी लाळगे व ...

सचिन वराळ, मंगेश वराळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील सरपंच पदाची निवडणूक असताना दोन दिवस आधी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद यांच्या अपहरण प्रकरणी सचिन वराळ व मंगेश वराळ यांचा जामीन अर्ज खेड (जि.पुणे) न्यायालयाने फेटाळला.
सचिन वराळ यांनी २० ते २५ जणांच्या मदतीने आघाडीच्या दोन सदस्यांचे खेड परिसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. तशी फिर्याद विठ्ठल भाऊसाहेब कवाद (रा. निघोज) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिल्याने सचिन वराळ यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. सरपंच पदाची निवड झाल्यावर अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी स्वत:ची सुटका झाल्यावर खेड पोलीस ठाणे गाठत जबाब दिला. त्यामुळे खेड न्यायालयाने ग्रामपंचायत सदस्यांचे झालेले अपहरण व त्यानंतर सचिन वराळ यांच्या पत्नी चित्रा वराळ या सरपंच होणे यामध्ये सचिन वराळ व मंगेश वराळ यांचा संबंध असल्याचा निष्कर्ष नोंदविला. सचिन वराळ व मंगेश वराळ यांचा जामीन अर्ज फेटाळत सर्व फरार आरोपींना हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील जोशी यांनी युक्तिवाद केला.
-----
गुंडांचा बंदोबस्त करा..
निघोज गाव दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरुपी वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमावे व पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. गावातील राजकीय गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना ग्रामस्थांसह भेटून करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद यांनी सांगितले.