तलावाला निधीचा अडसर
By Admin | Updated: July 19, 2014 00:36 IST2014-07-18T23:27:06+5:302014-07-19T00:36:58+5:30
जामखेड : भुतवडा जोड तलावाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे.
तलावाला निधीचा अडसर
जामखेड : भुतवडा जोड तलावाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे.
ठेकेदाराची असमर्थता
तलावाचे काम सध्या ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ पिचिंग व भरावाचे किरकोळ काम तसेच जुना व नवा भुतवडा तलावांना जोडणाऱ्या लिंक कालव्याचे तीस मीटर काम बाकी आहे. हे काम जून २०१३ पर्यंत पूर्ण होईल, अशी शासनाला आशा होती. परंतु ठेकेदाराने जुन्या अंदाजपत्रकाच्या दराप्रमाणे काम करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे २५५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकले नाही.
तालुक्यातील अमृतलिंग व भुतवडा लिंक तलावांची कामे अपूर्ण असल्याने तलावासाठी पैसे खर्च करुनही सिंचन निर्मिती होऊ शकत नाही. गेल्या पंधरा वर्षापासून या तलावाच्या निर्मितीला साडेसाती लागली आहे.
भुतवडा लिंक तलावाचे काम दोन हजार साली दोन कोट रुपये अंदाजपत्रकीय मंजूर होऊन सुरु झाले होते. अठरा महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करावयाचे होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम सातत्याने रखडले. अंतिम मुदत संपल्याने सन २००७ मध्ये ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी निविदा शर्थ रद्द केली.
योजनेच्या उर्वरित कामासाठी सन २००८ मध्ये पुुन्हा निविदा काढून हे काम पुणे येथील कंत्राटदाराला देण्यात आले. त्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आली. सन २००९ मध्ये लघुपाटबंधारे खात्याने तलावाचे काम करणाऱ्या पूर्वीच्या कंत्राटदाराला अंतिम देयक देताना मोजणी अहवाल विचारात न घेता सोळा लाख जादा देण्यात आले. आणि येथूनच कामाला साडेसाती लागली.
(तालुुका प्रतिनिधी)
निधीची गरज !
या जोड तलावाचे काम दहा टक्के अपूर्ण आहे. ठेकेदाराने काम केल्यास जादा मोबदला दिला जाईल. दोन तलावांना जोडणारा लिंक कालवा तीस मीटर लांब व त्यावरील पूल व इतर किरकोळ कामांसाठी सध्याच्या दराप्रमाणे ४५ लाखांच्या निधीची गरज आहे. राम ढेपे, कनिष्ठ अभियंता
आश्वासन हवेत विरले
२०१३ च्या हिवाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी तलावातील कामाविषयी प्रश्न उपस्थित केला तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी जून २०१३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची अद्याप पूर्णता झालेली नाही. मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तलावाला भेट देऊन निधीच्या तरतुदीचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासनही हवेत विरले आहे.