अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:19 IST2025-06-01T07:17:20+5:302025-06-01T07:19:33+5:30
चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा

अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही क्रांती घडवली. महिला सक्षमीकरण केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासनही वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे शनिवारी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, अण्णा डांगे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्यकारभार केला. या कार्यकाळात त्यांनी मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा निर्माण केली. त्यांनी देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार स्वतःच्या निधीतून केला. मोठी श्रीमंती असतानाही अहिल्यादेवी या अगदी साधेपणाने जीवन जगल्या म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या. आपल्या राज्यात हुंडाबंदी करून महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे हे कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपट काढणार आहे.
‘लेक लाडकी’ तशी ‘सूनही लाडकी’ म्हणा : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी लोककल्याणकारी राज्य जगाला दाखविण्याचे काम केले. चोंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम शासनाने केले आहे. आज आपण लेक लाडकी म्हणतो तसे सूनही लाडकी मानली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही.
चोंडीत उपोषण, मोर्चे नकोत
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळासाठी शासनाने ६८१ कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चोंडी हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या ठिकाणाचे पावित्र्य सर्वांनी जपावे. येणाऱ्या काळात चोंडी येथे कुणीही उपोषण व मोर्चा करू नयेत.