पाऊस लांबल्याने खरीप धोक्यात
By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-12T23:41:49+5:302014-07-13T00:19:10+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या साडे तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे़
पाऊस लांबल्याने खरीप धोक्यात
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
पावसाअभावी जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या साडे तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे़ कृषी विभागाच्या नियोजना नुसार १५ जुलैला खरिपाच्या पेरण्याचा हंगाम संपणार आहे. त्यानंतर अपेक्षित पाऊस होऊन पेरण्या झाल्या तरी त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे नगरसह शेजारी असणाऱ्या जिल्ह्यात धरणातील पाणीसाठा चिंताजनक असून धरणात पाणी नसेल तर पिण्यासाठी कोठून पाणी आणायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे.
जून पाठोपाठ जुलै महिन्याचे दहा दिवस कोरडे गेले आहेत. या कालावधीत सरासरी ५७.२६ मिमी पाऊस झालेला आहे़ मात्र, त्याची व्याप्ती सर्व दूर नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्यांना फारसा उपयोग झालेला नाही. नगर, शेवगाव, श्रीरामपूर, नेवासा आणि कर्जत तालुक्यातील काही भागात पाऊस झालेला आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात पेरण्या सुरू झालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्याची सरासरी पेरणी साडे तीन टक्क्यांपर्यंत पोहचू शकलेली आहे. मागील वर्षी जुलैपर्यंत जिल्ह्यात ५८ टक्के पेरण्या झाल्या होत्या़
जुलैअखेर पर्यंत जिल्ह्यात पाऊस न झाल्यास खरीप हंगामाच वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच काही प्रमाणात पाऊस झाल्यास उशीरापर्यंत पेरण्या झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत हंगाम वाया जाण्याचा धोका कायम आहे.
कोट्यवधीचे बियाणे पडून
बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे. यात सर्वाधिक महाग कांदा बियाणे आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांना बियाणे परत न घेण्याच्या अटीवर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे बियाणे विक्रेते अडचणीत सापडलेले आहेत. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पुढील आठवड्यात शिल्लक आणि विक्री झालेल्या बियाणांचा अहवाल देणार आहे.
खरीप हंगामाच्या आतापर्यंतच्या चित्रात पावसाअभावी मुगाच्या पेरणीचा कालावधी संपलेला आहे. उदिडाची शक्यता असून एकट्या जामखेड तालुक्यात पेरणी होऊ शकते. या तालुक्यात रब्बी हंगामाची उशीरापर्यंत पेरणी होत असते. बाजरीच्या पेरणीसाठी साधारणपणे जुलै अखेरपर्यंत कालावधी आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी महिनाअखेरपर्यंत शक्य आहे. साधारण ११० ते १२० दिवसांत येणाऱ्या या पिकाचे क्षेत्र वाढले तरी उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाऊस लांबल्यास त्याचा सर्वाधिक फायदा कपाशीच्या लागवडीसाठी होणार आहे. सर्वसाधारणपणे या महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यात तूर, बाजरी, सोयाबीन आणि कपाशीची लागवड करता येणार आहे.
शेतकऱ्यांचे जगणेच कठीण
जिल्ह्यात पाथर्डी तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. चालू वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याशिवाय या तालुक्यात अन्य कोणतीच पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे तातडीने शासनाने पावले उचलून उपाय योजना करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल.
- सीताराम बोरूडे, शेतकरी, पाथर्डी.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावले आहे. उन्हाळ्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. निदान खरिपात चांगला पाऊस झाल्यास शेतीतून चार पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने ही आशा मावळली आहे. दुसरीकडे शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी योग्य नसल्याने अडचणी वाढलेल्या आहेत.
- मधुकर तारडे, शेतकरी, केंदळ, राहुरी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या दुष्काळाकडे गंभीरतेने पाहावे. टँकरवर खर्च करण्यापेक्षा धरणाच्या क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडणे आवश्यक आहे. जेणे करून धरणात पाणी असले तर त्याचा किमान चारा उत्पादन आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करता येईल. ग्रामीण भागात वाईट परिस्थिती असून कृत्रिम पावसाचा निर्णय तातडीने व्हावा.
- राजेश परजणे, अध्यक्ष
गोदावरी दूध संघ, कोपरगाव.
पावसाने ताण दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत. काही भागात तुरळक पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करतांना योग्य पध्दतीने पेरण्या कराव्यात. यासाठी गादी वाफे, ठराविक उतारावर नागरांचे आडवे तास टाकवेत. जेणे करून पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवता येईल आणि त्याचा उपयोग संबंधित पिकाला होईल.
- विलास नलगे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद.
१९७० ते १९७२ या काळात मोठा दुष्काळ पडला. या काळात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हाताला काम आणि पोटाला भाकर नव्हती. आता उलटी परिस्थिती आहे. पिण्यासाठी पाणीच नसल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांपासून ते सर्व सामान्यांपर्यंत सर्वांवर होतांना दिसत आहे. यामुळे लवकरात लवकर पाऊस व्हावा, ही अपेक्षा आहे.
- दिलीप मदने, शेतकरी संगमनेर.
तालुकानिहाय स्थिती
नगर : तालुक्यात बाजरी (९२७ हेक्टर), मका (३६५), तूर (५), मुग (२३), सोयाबीन (३०२) कापूस (९०) या पिकांची ४०४० हेक्टरवर पेरणी झाली आहे़
पारनेर : तालुक्यात बाजरी (५५), मका (८०) या पिकांची १३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ जिल्ह्यात सर्वात कमी पेरणी पारनेर तालुक्यात आहे़
पाथर्डी : बाजरी (७६६), तूर (८८), मुग (१६), उडिद (७), कापूस (९२५) या पिकांची १८०२ हेक्टरवर पेरणी झाली आहे़
कर्जत : बाजरी (५१), मका (३०), तूर (१२), मूग (१५), कापूस (१९७) पिकांची ३०९ हेक्टरवर पेरणी झाली आहे़
जामखेड : बाजरी (१२), तूर (१६), मुग (३८), कापूस (३०४), मका (१), सोयाबीन (२३), उडीद (९१) अशी एकूण ४८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे़
श्रीगोंदा : बाजरी (२५९), मका (१), तूर (३), मुग (३२), उडीद (९३) अशी एकूण ३८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
संगमनेर : बाजरी (३४९), मका (१), तूर (३), मका (४५), कपाशी (१४६) अशी एकूण ५५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
अकोले : भात (३५ ), भुईमुग (४१), तूर (२), उदीड (२८), सोयाबीन (२०) अशी एकूण १४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
कोपरगाव : मका (१५), भुईमुग (२), मका (१५), कपाशी (१६८) अशी एकूण १८५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
राहाता : सोयाबीन (२), कपाशी (२५) अशी एकूण २७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
श्रीरामपूर : सोयाबीन (४) कपाशी (११५) अशी एकूण ११९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
राहुरी : बाजरी (७५), मका (२८), मुग (१०), कपाशी (१८५४) अशी एकूण २०४० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
शेवगाव : बाजरी (१०२), कपाशी (८७९) अशी एकूण ९८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.