अहिल्यानगरमध्येही ‘मस्साजोग’; गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची अमानुष हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:25 IST2025-03-04T05:25:26+5:302025-03-04T05:25:43+5:30
याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

अहिल्यानगरमध्येही ‘मस्साजोग’; गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची अमानुष हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : बीडमधील मस्साजोगची घटना ताजी असतानाच अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह डोंगरात नेऊन जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (१९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याचे अपहरण केले होते. त्यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूंज ऊर्फ गोट्या (वय १९, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते.
संदेशला त्याच्या घरून कारमध्ये घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन नवीन ले-आउटमध्ये गटारीसाठी केलेल्या चेम्बरमध्ये कोंबून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आरोपींनी काढला. तेथून त्याला नागापूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारीला संदेश याच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा संदेश आला, म्हणून आरोपींनी संदेशला वैभव नायकोडी यास फोन करण्यास सांगितले. संदेशने वैभवला फोन करून तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलविले.
आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून वैभव ज्या सलूनच्या दुकानावर थांबला होता तेथे नेले. नायकोडीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींनी दोघांना पुन्हा निर्जनस्थळी नेत चेम्बरमध्ये घालून मारहाण केली. त्या रात्री दोघांनाही फ्लॅटमध्ये डांबले. तेथे आरोपींनी त्यांना मॅगी खाण्यास दिली. संदेशने मॅगी खाल्ली, पण वैभवने नकार दिला. म्हणून, त्यास पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला आरोपींनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला. त्यानंतर आरोपींनी संदेशला घडल्या प्रकाराबाबत कोठे न बोलण्याची धमकी देत सोडले. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेशने पोलिसांत येत ही सर्व हकीगत सांगितली आहे.
हत्या का केली?
तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. गत १९ जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशी याच्यावर एक अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर पाच साथीदारांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी व संदेश हे दोघे सोमवंशीला मारहाण करणाऱ्या टोळीसोबत राहतात, या रागातून त्यांचे अपहरण केले होते.