जिल्हा बँकेसाठी पाच सदस्यीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:23+5:302021-01-15T04:18:23+5:30
अहमदनगर : जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीकडून नगरविकास ...

जिल्हा बँकेसाठी पाच सदस्यीय समिती
अहमदनगर : जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीकडून नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राजेंद्र फाळके, राहुल जगताप आणि उदय शेळके यांची समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मुंबईत बैठक झाली़ या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, रोहित पवार, नीलेश लंके, अशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उदय शेळके , माजी आमदार राहुल, जगताप आदी नेते उपस्थित होते़ बैठकीत पवार यांनी बँकेच्या सद्यस्थितीबाबत जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा केली व अागामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेच्या २१ संचालक मंडळासाठी ही निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे अकोले, पारनेर, कोपरगाव, राहुरी, कर्जत- जामखेडमध्ये आमदार आहेत. श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादीचे राहुल जगताप, तर शेवगावमध्ये चंद्रशेखर घुले हे दोन माजी आमदार आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकत मिळणार आहे. माजी आमदार घुले हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याशी पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला़ अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांच्याशी पवार यांनी फोनवरून चर्चा केल्याचे समजते. पवार यांनी स्वत:च बँकेच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते कंबर कसून कामाला लागली आहेत. पवार यांनी बँकेच्या निवडणुकीबाबत घेतलेली ही पहिलीच बैठक आहे. यानंतरच्या बैठका जिल्ह्यात होणार असून, या बैठकीत सर्व घटक पक्षांतील नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे़ निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे़
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्रित बँकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणानुसार तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मोट बांधणे कठीण आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे या दोन नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे; मात्र हे दोन्ही दिग्गज नेते आता वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणुकीत उतरणार आहेत. जिल्ह्यात विखे व थोरात अशा दोन गटांत नेते विभागलेले आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली जात असून, याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
...
सोधा पक्षाची अडचण
जिल्ह्यातील मातब्बर नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी स्थानिक पातळीवर हे नेते एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात, असा पूर्वनुभव आहे़ त्यामुळे स्थानिक निवडणुकीत पक्षीय भूमिकांना महत्त्व राहत नसते; परतु यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्याने सोधा पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.