खत टाकायला गेलेल्या बाप-लेकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; गावकऱ्यांचा महावितरणवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:56 IST2025-06-24T14:54:48+5:302025-06-24T14:56:56+5:30
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथे विद्युत तारेला चिकटून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

खत टाकायला गेलेल्या बाप-लेकाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; गावकऱ्यांचा महावितरणवर आरोप
Jamkhed Accident: अहिल्यानगरमध्ये उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेतातील विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील ग्रामपंचायतीचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (४२) व त्यांचा मुलगा गणेश शिकारे (१५) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
बाळगव्हाण येथे शिकारे वस्ती येथे राहणारे काकासाहेब व त्यांचा मुलगा गणेश हे दोघे सोमवारी शेतात गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय व काही ग्रामस्थांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला. तेव्हा दोघांचाही मृतदेह शेतात विजेच्या तुटलेल्या तारेजवळ आढळून आला. गावात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील विजेच्या तारा तुटल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी वीज तारा तुटल्या असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दोघांचा बळी गेला असल्याचे बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याला जबाबदार असणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी
या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेसाठी महावितरण जबाबवदार असल्याचे म्हटलं. "शेतात खत टाकण्यासाठी गेले असताना विजेच्या तुटलेल्या तारेचा धक्का बसून खर्डा (ता. जामखेड) परिसरातील शिकारे वस्ती बाळगव्हाण येथील ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब शिकारे (४२) आणि त्यांचा मुलगा महेश (१५) या पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना आहे. या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या या तारा अद्यापही तशाच पडून आहेत आणि त्यामुळंच या बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला. याला पूर्णतः महावितरण जबाबदार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कधीही भरून न निघणारी हानी लक्षात घेता शिकारे कुटुंबालाही मदत करावी, ही विनंती!," असं रोहित पवार यांनी म्हटलं.