दुष्काळी २१ गावांना दिलासा

By Admin | Updated: May 5, 2016 00:02 IST2016-05-04T23:52:49+5:302016-05-05T00:02:24+5:30

रियाज सय्यद ल्ल संगमनेर ऐन दुष्काळात भीषण पाणी टंचाईमध्ये तळेगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या दुरूतीसाठी २४ लाख ७० रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे.

Drought relief to 21 villages | दुष्काळी २१ गावांना दिलासा

दुष्काळी २१ गावांना दिलासा

२५ लाख मंजूर : तळेगाव योजनेची दुरूस्ती; पूर्ण दाबाने मिळणार पाणी
रियाज सय्यद ल्ल संगमनेर
ऐन दुष्काळात भीषण पाणी टंचाईमध्ये तळेगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या दुरूतीसाठी २४ लाख ७० रूपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील तहानलेल्या २१ गावांना आता पूर्ण दाबाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
अवर्षणप्रवण क्षेत्रामुळे तळेगाव दिघेचा परिसर दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. खडकाळ, माळरान जमीन, पावसाचे अत्यल्प प्रमाण व नैसर्गिक उद्भवांची कमतरता या भागात असल्याने सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. तळेगावसह २१ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना आहे. निंभाळे परिसरात प्रवरा नदीपात्रातून पाईपलाईनद्वारे पाणी उचलून आणून सदर योजनेत टाकले जाते. तेथून पुढे योजनेवर अवलंबून असलेल्या २१ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेच्या पंपींग मशिनरी गेल्या काही वर्षांपासून नादुरूस्त झाल्या आहेत. परिणामी योजनेवर अवलंबून असलेल्या २१ गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. योजनेच्या व्यवस्थापन समितीने मशिनरी दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविला. परंतु त्यास मंजुरी मिळत नसल्याने नागरिकांना पाणीपट्टी भरूनही पाणी मिळणे अशक्य झाले होते.
यंदा उन्हाळ्यात तळेगाव भागात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू झाल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सचीवस्तरीय स्थायी समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत तळेगाव योजनेच्या पंपींग मशिनरी बदलण्याच्या कामासाठी २४ लाख ७० हजार रूपयांच्या विशेष दुरूस्ती खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत दुरूस्तीची सर्व कामे करण्यात येणार आहेत. ही कामे टंचाई कालावधीच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा मान्यता रद्द होवू शकते. कामाची निविदा मंजूर झाल्यावर सुरूवातीला नाशिक विभागीय आयुक्त ५० टक्के निधी उपलब्ध करून देतील, तर उर्वरित निधी योजना कार्यान्वीत झाल्यावर दिला जाईल.
योजनेचे काम झाल्यावर देखभाल दुरूस्ती व व्यवस्थापन संबंधित ग्रामपंचायतीस करावे लागणार आहे. दुरूस्ती होऊन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत होणार असल्याने आता योजनेवरील २१ गावांना आता पूर्ण दाबाने पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे पाणी कपातीपासून या गावांची तुर्तास सुटका झाली आहे.

Web Title: Drought relief to 21 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.