कर्जमाफीची मागणी म्हणजे शिवसेनेचे उशिराचे शहाणपण

By Admin | Updated: May 5, 2016 00:02 IST2016-05-04T23:55:13+5:302016-05-05T00:02:33+5:30

शिर्डी : केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण असल्याची

The demand for debt waiver is the longstanding wisdom of the Shiv Sena | कर्जमाफीची मागणी म्हणजे शिवसेनेचे उशिराचे शहाणपण

कर्जमाफीची मागणी म्हणजे शिवसेनेचे उशिराचे शहाणपण

राधाकृष्ण विखे : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी बैठक बोलवावी
शिर्डी : केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी, ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
शेतकरी कर्जमाफी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी लातूरमध्ये केलेल्या मागणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शिर्डीत विखे म्हणाले, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस मागील तीन अधिवेशनापासून सातत्याने कर्जमाफीची मागणी करीत आहेत. आता सत्ताधारी पक्षातील शिवसेना देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करू लागली आहे. त्यामुळे कर्जमाफीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील चारही अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली. तेव्हा मात्र शिवसेना गप्प बसली होती. आता अचानक शिवसेनेला शेतकरी कर्जमाफीची आठवण कशी झाली, हेच मोठे आश्चर्य आहे.
शेतकरी कर्जमाफीची मागणी आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे शिवसेना कर्जमाफीच्या मागणीवर ठाम असेल तर त्यांनी सरकारवर यासंदर्भात तातडीने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी दबाव आणावा. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर १५ दिवसात कर्जमाफीची घोषणा करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना आवश्यक त्या उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आलेले आहे. प्रशासकीय यंत्रणेवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सरकारच्या दुष्काळ उपाययोजना केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत. त्यामुळेच दुष्काळासंदर्भात न्यायालये देखील सरकारला फटकारू लागली आहेत. भीषण दुष्काळाला सामूहिकपणे सामोरे जाण्याची गरज असताना सरकारमधील दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे राज्यातील जनतेचा मात्र नाहक बळी जात असल्याची टीकाही राधाकृष्ण विखे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The demand for debt waiver is the longstanding wisdom of the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.