उमेदवारी नाकारली तर कॉँग्रेसला ‘रामराम’ : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:42 IST2018-10-28T16:42:09+5:302018-10-28T16:42:13+5:30
कॉँग्रेस आमच्या रक्तातच आहे.

उमेदवारी नाकारली तर कॉँग्रेसला ‘रामराम’ : सुजय विखे
केडगाव : कॉँग्रेस आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे कॉँग्रेसकडेच लोकसभा उमेदवारीची मागणी करणार आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून न घेणारा भाजप हा आमचा नंबर एकचा शत्रू आहे. यामुळे कॉँग्रेसकडूनच उमेदवारी करणार आहे. कॉँग्रेसने नाकारले तर पक्षीय जोडे बाजूला ठेऊन पुढे जाऊ, असे म्हणत डॉ. सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भूमिका मांडली.
नगर तालुक्यातील खडकी येथील कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते. यावेळी काँगेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, दत्ता नारळे, सरपंच अर्चना कोठुळे, उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, बाबुर्डी बेंदचे उपसरपंच अण्णा चोभे, प्रवीण कोठुळे, हरिभाऊ निकम, बापूसाहेब कोठुळे, भास्करराव कोठुळे, पंढरीनाथ कोठुळे, ज्ञानदेव भोसले, शरद कोठुळे, अमृत कोठुळे, सुनील कोठूळे आदी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, भाजपा हा कधीच शेतकºयांचा पक्ष नव्हता. त्यामुळे शेतकºयांविषयी त्यांच्यात कोणीच बोलत नाही. येथील लोकप्रतिनीधींनाही शेतीतले काही माहीत नाही. त्यामुळे शेतकºयांचे दु:ख त्यांना कसे कळणार. येणारा काळ फार कठीण आहे. टँकर कोठून भरायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी योजना वाढत्या विजबिलांमुळे अडचणीत आल्या आहेत. कर्जमाफी अटी शर्तीत अडकली, तशा आता जनावरांच्या छावण्यांसाठी अटी शर्ती लावल्या जातील, अशी टीका केली.
..तर पालकमंत्र्यांचा ६० हजार मतांनी पराभव
पालकमंत्रीच त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास करू शकले नाहीत, तर जिल्ह्याचा काय विकास करणार? कुकडीच्या पाण्याची घोषणा फक्त त्यांनी केली. त्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का असा प्रश्न डॉ. विखे यांनी केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहेत. त्या ठिकाणी एकास एक लढत झाली, तर पालकमंत्री ६० हजार मतांनी पराभूत होतील, असा दावा केला.