करिअर निवडून त्या दिशेने आगेकूच करा-मंदार जवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 18:01 IST2020-01-15T17:59:46+5:302020-01-15T18:01:08+5:30
ध्येय ठरवताना वाटेत येणारे प्रलोभने, आमिषे प्रयत्नपूर्वक टाळावेत. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरला तर करिअरसाठी ते उपयुक्त ठरते. परंतु गैरवापर केल्यास करिअर खराबही होऊ शकते, असा मोलाचा सल्ला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी युवकांना दिला आहे.

करिअर निवडून त्या दिशेने आगेकूच करा-मंदार जवळे
अनिल साठे ।
शेवगाव : युवकांनी शिक्षणाबरोबर शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करिअरचे ध्येय लवकरात लवकर निश्चित करून त्या दिशेने आगेकूच करायला हवी. ध्येय ठरवताना वाटेत येणारे प्रलोभने, आमिषे प्रयत्नपूर्वक टाळावेत. मोबाईलचा वापर करताना सोशल मीडिया योग्य पद्धतीने वापरला तर करिअरसाठी ते उपयुक्त ठरते. परंतु गैरवापर केल्यास करिअर खराबही होऊ शकते, असा मोलाचा सल्ला पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी युवा दिनानिमित्त युवकांना दिला आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार, युवा वर्गाला उद्देशून त्यांनी केलेले प्रेरणादायी भाषण, त्यांच्या अमोघ वाणीतून उतरलेले सुविचार आजही आपले आयुष्य योग्य दिशेला नेण्यासाठी पूरक ठरले आहेत. असे विचार ज्यांनी मांडले ते आद्यगुरू, विचारवंत स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस सन १९८५ पासून ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा होतो. युवकांना स्वामी विवेकानंदांचे हे विचार प्रेरणादायी ठरतात.
व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करताना अभ्यासाबरोबर मैदानी खेळ व इतर कलागुणांनाही वेळ दिला पाहिजे. स्पर्धेत टिकायचे असेल तर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे हेही लक्षात आले पाहिजे. यशाला परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वत:ची क्षमता वाढवण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धेला सामोरे जाणारा तरुण हा जग बदलवण्याची ताकद स्वत:मध्ये ठेवतो. आपल्याला आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्याची जडणघडण नेहमी सुरू ठेवावी, असे ते म्हणतात.
कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचारासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचे गुपित आहे. वाचण्यासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाया आहे आणि स्वत:साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे दुस-यासाठी वेळ द्या. कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही, असे विचार स्वामी विवेकानंदांनी मांडले आहेत. ‘त्यांना’ अभिप्रेत असलेला देश व देशातील युवक घडवायचा असेल तर त्यांचे विचार जोपासायला हवेत,
असेही जवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.