महायुतीसमोर ‘गृहकलहा’चे आव्हान!
By Admin | Updated: June 20, 2014 00:38 IST2014-06-20T00:35:23+5:302014-06-20T00:38:26+5:30
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत शहरात मिळालेल्या यशाने महायुतीत गृहकलहाला आमंत्रण मिळाले आहे.

महायुतीसमोर ‘गृहकलहा’चे आव्हान!
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत शहरात मिळालेल्या यशाने महायुतीत गृहकलहाला आमंत्रण मिळाले आहे. २५ वर्षे मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या आमदार अनिल राठोडांना काँग्रेस-राष्ट्रवादी आजवर ‘तगडे आव्हान’ देऊ शकलेली नाही. मात्र खुद्द सेनेतुनच राठोडांच्या विरोधातील सूर बुलंद झाल्याने लोकसभेतील खणखणीत यश टिकवून ठेवणे महायुतीसाठी आव्हान ठरणार आहे. बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. राष्ट्रवादी मात्र महापालिका निवडणुकीपासूनच या जागेवर डोळा ठेवून आहे.
नगर जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून भलेही काँग्रेस रुजली असेल, मात्र नगर शहरात काँग्रेसच्या धुरंधरांना २५ वर्षापासून अनिल राठोड ‘चकवत’ आले आहेत. राठोडांच्या लोकप्रियतेचे निश्चित गणितही मांडता येत नाही. अडल्या-नडलेल्यांसाठी धाऊन जाणारा आमदार, हीच काय ती प्रतिमा. मात्र ठसठसीत. विकासाच्या नावाने बोंब. नगर आणि राठोड हे समिकरण जेवढे घट्ट, तेवढीच विकास आणि राठोड यातील दरी रुंद! आता ही दरी स्वकियांशीही वाढली आहे. खुद्द सेनेतूनच त्यांच्या विरोधाचे स्वर उमटले आहेत. दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी नगर शहर मतदारसंघावर दावा ठोकून सेनेच्या या उपनेत्याला अडचणीत आणले आहे. तीच गत मित्रपक्षातून. मोदी लाटेवर खासदार झालेले दिलीप गांधी आणि राठोडांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभा निवडणुकीत राठोडांनी काय केले, हे लपून राहीलेले नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राठोड-गांधी वादाने कटुतेचे टोक गाठले होते. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर तर त्यांचे चिरप्रतिद्वंदी! भाजपातील राठोड विरोधकांची ताकद गाडेंच्या पाठीशी आहे. आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढविते. काँग्रेसलाही पाच वर्षात नवा चेहरा शोधता आलेला नाही. ‘गलीतगात्र’ हा शब्द शहर काँग्रेससाठी चपखल बसावा. शहरात वावरणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोणी, संगमनेरचे नेतृत्व सोयीप्रमाणे स्वीकारले आहे. ‘तेच’ काहीतरी चमत्कार घडवतील, असा त्यांचा भाबडा विश्वास. त्यामुळे कधी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे तर कधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी उडते. डॉ.सुजय यांनी हा विचार कधीच थंडबस्त्यात टाकल्याचे म्हटले जाते. तांबे मात्र तयारीत दिसतात. चाचपडणाऱ्या काँग्रेसवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाली आहे.
महापौर संग्राम जगताप या आपल्या चिरंजीवाला आमदार करण्याचे मनसुबे आ.अरुण जगताप बाळगून आहेत. जागा काँग्रेसच्या वाट्याला असणे, हीच त्यांची अडचण. नात्या-गोत्याच्या राजकारणावर भिस्त ठेवून, त्यांची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. मनसेत उमेदवारीवरुन महापालिका स्थायी सभापती किशोर डागवाले आणि वसंत लोढा हा सामना आधीच रंगतदार वळणावर आहे. २२ रोजी राज ठाकरेंसोबत मुंबईत होणाऱ्या बैठकीत मनसेची दिशा अधिक स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
शिवसेना अनिल राठोड ६५२७१
काँग्रेससुवालाल गुंदेचा २५७२६
अपक्षअभय आगरकर १७७८१
इच्छुकांचे नाव पक्ष
अनिल राठोड शिवसेना
संग्राम जगताप राष्ट्रवादी
सत्यजीत तांबे काँग्रेस
शशिकांत गाडे शिवसेना
किशोर डागवाले/वसंत लोढा मनसे