भाजपनेच लांबविली गटनोंदणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:04 IST2018-12-16T18:04:51+5:302018-12-16T18:04:55+5:30
नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने रजेवर असल्याचे कारण पुढे करून राजकीय पक्षांनीच गटनोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.

भाजपनेच लांबविली गटनोंदणी?
अहमदनगर : नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने रजेवर असल्याचे कारण पुढे करून राजकीय पक्षांनीच गटनोंदणीची प्रक्रिया पुढे ढकलली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी नवे पर्याय मिळावेत, यासाठी जाणीवपूर्वक ही गटनोंदणी लांबविल्याची चर्चा आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमतासाठी ३५ नगरसेवक कोणत्याही एका पक्षाकडे असणे आवश्यक आहे. शिवसेना २४ जागा जिंकून सर्वाधिक पक्ष ठरला असला तरी अन्य कोणत्याही एका पक्षाचा पाठिंबा मिळविण्याशिवाय सेनेसमोर पर्याय नसल्याचे दिसते. नैसर्गिक युती झाल्यास शिवसेना-भाजप या दोन पक्षांचे मिळून ३८ नगरसेवक होतात. मात्र स्थानिक पातळीवरील सेना-भाजपच्या नेत्यांचे सख्य नसल्याने शिवसेना किंवा भाजपसमोर अन्य पर्याय शोधण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी ही गटनोंदणी जाणीवपूर्वक लांबविल्याची चर्चा आहे.
नाशिक येथे विभागीय आयुक्त राजाराम माने हे दोन दिवस रजेवर आहेत. हेच कारण पुढे करून सर्वच पक्षांनी गटनोंदणी सोमवारी (दि. १७)करण्याचा निर्णय घेतला. विभागीय आयुक्त रजेवर असले तरी वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांकडून गटनोंदणी करून घेता येते. कोणी रजेवर आहे म्हणून काम थांबत नाही, असे विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. गटनोंदणी ही संबंधित पक्षांशी संंबंधित आहे. त्यामुळे गटनोंदणीच्या प्रक्रियेचा महापौर निवडीच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नाही. विभागीय आयुक्त किंवा समकक्ष अधिकाºयांच्या उपलब्धततेवर महापौर निवडीची तारीख जाहीर होणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान माने हे रजेवर जाण्यामागे भाजपची काही खेळी तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित झाली आहे. सोमवारपर्यंत भाजपही राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा करून नवा पर्याय देण्याबाबत चर्चा करू शकते.
महापौर झाला तरच....
‘महापौर झाला तरच महापालिकेला तीनशे कोटी देऊ’,असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगर येथील सभेत दिले होते. महापालिकेत बहुमत आले तरच असा शब्दप्रयोग त्यांनी केला नव्हता. बहुमत नसले तरीही महापौर हा भाजपचा होऊ शकतो, असेच त्यांना त्यावेळी म्हणायचे होते, असा त्यांच्या विधानाचा अर्थ आता काढला जात आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी-बसपा असे समीकरणही चर्चेत आहे.