लोकमत न्यूज नेटवर्क
चांंदेकसारे : पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय निवडला. कालांतराने हा मुख्य व्यवसाय झाला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाल्याने ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, तर दुसऱ्या बाजूला दुधाचे दर ढासळले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पोहेगाव सोनेवाडी, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द आदी परिसरात शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाला जास्त पसंती दिली. शेतकऱ्यांची अनेक मुले नोकरीच्या मागे न लागता दूध व्यवसायात उतरून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दूध व्यवसायाला उतरती कळा लागली असून दुधाचे दर सोळा ते वीस रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना घरातून पैसे टाकावे लागत आहेत. सरकी पेंड व इतर खाद्याचे दर गगनाला भिडले असून जे खाद्य ९०० ते १ हजार रुपयाला मिळायचे, त्या खाद्याची किंमत २ हजार रुपये झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न व खर्चाचा मेळ साधताना मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक नेत्यांनी सरकारकडे दुधाला अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र ती मागणी हवेत विरली आहे. कोरोना परिस्थितीचे कारण सांगून मोठ्या दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांच्या दुधाला कवडीमोल भाव देत शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. सहा महिन्यांपूर्वी दोन गाई पाळल्या तरी शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपये महिन्याला मिळत होते. एक गाय साधारण वीस लिटर दूध देते. खाद्यखर्च वजा जाता त्यावेळी दूध उत्पादकांना हा व्यवसाय नफ्याचा वाटायचा. मात्र आता खाद्य आणि चारा याची गोळाबेरीज केली तरी, शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. मध्यंतरी दूध विक्रीदर २ रुपये वाढवले. मात्र दूध खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयाही वाढवला नाही. ही परिस्थिती अशीच राहिली, येत्या काही दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही, तर ग्रामीण भागातील दूध व्यवसाय मोडकळीस येण्याची चिन्हे आहेत.