शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:57 IST2020-06-09T15:54:39+5:302020-06-09T15:57:00+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला. अज्ञात इसमाने तळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणी दूषित झाले आहे.

25,000 fish die in farms; Act from unknown in Bherdapur | शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य 

शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य 

श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला. अज्ञात इसमाने तळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणी दूषित झाले आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश पंडित कवडे व पंडित लक्ष्मण कवडे यांच्या एक एकर क्षेत्रात शेततळे आहे. त्यांनी मत्स्यपालन केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांनी सोयापिनस (कोंबडा) जातीचे २५ हजार मासे त्यात सोडले होते. त्याची आजमितीस पूर्ण वाढ झाली होती. 

चार-पाच दिवसापूर्वी कवडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता त्यांना मृत मासे दिसून आले. त्यानंतर ५ जून रोजी तळ्यातील पूर्ण मासे मृत झाले होते. मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज कवडे यांनी वर्तविला आहे. त्यांनी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. तलाठी विकास शिंदे यांनी पंचनामा केला आहे.

मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करणार
दरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर कवडे यांनी मुळा धरणावरील तज्ञांकडून शेततळ्यातील पाण्याची तपासणी करून घेतली. मात्र शेततळ्यातील पाण्यात कुठलाही दोष नसल्याचे सांगण्यात आले. मृत मासे नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.

Web Title: 25,000 fish die in farms; Act from unknown in Bherdapur