अहमदनगर : फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकर्यांचे कंबरडे मोडले. त्यांना सरकारने मदतीचा हात दिला आहे. यापूर्वी दोन टप्प्यात ४७ कोटी मदत दिल्यानंतर तिसर्या टप्प्यात १०४ कोटी १२ लाख ८३ हजार रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला आहे. जिल्ह्यासाठी १५१ कोटी १२ लाख ८३ हजार रूपये मंजूर केले होते. त्यातील ४७ कोटी रूपये यापूर्वीच आले होते. ते तालुकानिहाय शेतकर्यांना वाटपही झाले आहेत. फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील तब्बल २ लाख २० हजार ९६४ शेतकर्यांच्या पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. १ लाख ३३ हजार ३७४ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीच्या निकषामुळे ४० हजार ६६५ हेक्टरवरील क्षेत्रासाठी कोणतीच मदत मिळाली नाही. तालुकानिहाय वाटप केलेली रक्कम (आकडे लाखात) नगर- २०३.५०, नेवासा- १३०८.५०, पाथर्डी - २०६, शेवगाव - ९३०, श्रीगोंदा ३१९, पारनेर १२२०, कर्जत - ८८९, जामखेड १०१, अकोले - ३६३, संगमनेर - १०७२, कोपरगाव - ११८७, राहाता - ६६२, श्रीरामपूर - ४१७, राहुरी - १२३६.३० रक्कम वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांनी बँक खाते क्रमांक तलाठ्यांकडे दिलेला नाही. त्यांनी तो त्वरित द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी केले.(प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांसाठी १०४ कोटी वर्ग
By admin | Updated: March 26, 2024 14:44 IST