सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३०, चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 08:00 IST2017-09-15T08:00:00+5:302017-09-15T08:00:00+5:30
आपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का?

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ३०, चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात
- सदगुरू श्री वामनराव पै
आपल्याला देवाने वाचा दिलेली आहे,ती इतर प्राण्यांना दिलेली नाही. कुत्र्याला भाकरी दिली की तो कधी थँक्यू म्हणतो का? पण माणसाला काही दिले तर तो म्हणेल आभारी आहे किंवा शुक्रिया किंवा थँक्यू. माणसाला बोलता येते पण त्याचा तो वापर चांगला करतो का? अगदी तसाच तो बुध्दीचा देखील चांगला वापर करत नाही. बोलताना तो नेहमी वाईटच बोलतो. खरंतर चांगले बोलणे लोकांना माहितच नाही.याबाबत आमच्या मंडळातील एक ट्रस्टी त्यांच्या ऑफिसामधील घडलेली गोष्ट सांगतो, “मी प्रवचनातून सांगितले होते की बोलताना चांगलेच बोला.कुणाची निंदा करू नका.
चांगले बोलण्याचे फायदे चांगलेच होतात. वाईट बोललात तर त्याचे दुष्परिणाम फार होतात. आमच्या या ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये ऑफिसर चहाला एकत्र जमायचे. त्यांच्या बैठकीला सुरवात व्हायची ती दुस-यांच्या निंदेनेच. आमच्या ट्रस्टींनी त्या मंडळींना सांगितले हे बघा यापूढे आपण जे काही बोलायचे ते चांगलेच बोलायचे वाईट बोलायचे नाही मी असे ठरविले आहे. बाकीचे सर्वही म्हणाले हो हो सद्गुरूंनी हे फार चांगले सांगितले आपण तसेच करूया. सगळ्यांनी एकमताने ठराव पास केला की आजपासून आपण फक्त चांगलेच बोलायचे,वाईट बोलायचे नाही. पण नंतर गप्पा मारताना सगळे जण गप्पच झाले.
कारण काय बोलायचे याचा विचार करत ते एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. काय बोलायचे हा त्यांना एक मोठा गहन प्रश्नच पडला. आतापर्यंत ते नेहमी दुस-यांची चेष्टा करीत असत.लक्षात ठेवा चांगले बोलणे हे जितके सोपे वाटते तितके ते सोपे नाही. माणूस वाईट सहज बोलतो,सहज तो दुस-यांची निंदा-नालस्ती करतो. याबाबत एक गोष्ट आहे की एका गावामध्ये संध्याकाळी वडाच्या झाडाच्या पारावर सगळे गावकरी येवून बसायचे गप्पा मारत रात्र झाली की आपआपल्या घरी जायचे. त्यांत एक माणूस नेहमी सगळ्यांच्या आधी यायचा व सर्वांच्या नंतर जायचा. काही दिवसांनी हे कुणाच्यातरी लक्षांत आले.
कुणीतरी त्याला प्रश्न विचारला काय रे बाबा हयाचे कारण काय. तर तो त्यावर म्हणाला याचे गुपीत असे आहे की मी जर इथे हजर नसेन तर सर्वजण माझी निंदा करतील पण मी तिथे हजर असलो तर माझ्याबद्दल कुणी काहीच बोलणार नाही. कारण आपल्यापैकी जो हजर नसतो त्याच्याबद्दल आपण नेहमी निंदा करतो पण जो हजर असतो त्याच्याबद्दल बोलण्याची आपली हिम्मत होत नाही, सांगायचा मुद्दा जगांत हे असेच चाललेले आहे.