२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 03:37 PM2023-02-18T15:37:21+5:302023-02-18T15:38:09+5:30

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बॅंक खाते लिहिण्यात कुचराई

Schools are the obstacles to the 'merit' of 22 thousand meritorious students | २२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा

googlenewsNext

अविनाश साबापुरे

यवतमाळ : वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन हजारो कोवळी मुले शिष्यवृत्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. मेरीट लिस्टमध्येही आली. परंतु या गुणवंतांची त्यांच्याच शाळांना अजिबात कदर नसल्याने त्यांचा बॅंक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे.

पूर्वउच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवी आणि पूर्वमाध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०२२ च्या जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडली. तर यंदा ३ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यात पाचव्या वर्गातील १६ हजार २३२ आणि आठव्या वर्गातील १२ हजार ९३९ असे २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. आता त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच त्यांचे बॅंक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविणे आवश्यक आहे.

मात्र, परीक्षा परिषदेकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांनी, तेथील मुख्याध्यापकांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. तब्बल महिना उलटून गेल्यानंतर २९ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजार विद्यार्थ्यांचे खाते परिषदेला कळविण्यात आले. तर २२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यांचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. त्यामुळे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी सर्व जिल्हा यंत्रणांना निर्वाणीचे पत्र पाठविले आहे.

इयत्ता पाचवीचे वंचित विद्यार्थी

रायगड २७९, ठाणे ५०२, पालघर २३८, पुणे ८४२, अहमदनगर ५८८, सोलापूर ५३७, नाशिक ५९७, धुळे २२१, जळगाव ४४५, नंदूरबार १८३, कोल्हापूर ४३८, सातारा ३५८, सांगली ३५३, रत्नागिरी १७४, सिंधुदुर्ग ९३, औरंगाबाद ४०३, जालना २१४, बीड ३३९, परभणी १८९, हिंगोली १३९, अमरावती ४६०, बुलडाणा ३३७, अकोला २७०, वाशिम १९१, यवतमाळ ३७७, नागपूर ६९६, भंडारा १७५, गोंदिया १९२, वर्धा १६१, चंद्रपूर ३१९, गडचिरोली १३०, लातूर ३३५, उस्मानाबाद २१८, नांदेड ३९०, मुंबई १२५० एकूण १२,६३३.

इयत्ता आठवीचे वंचित विद्यार्थी

रायगड २४८, ठाणे ३६१, पालघर १२९, पुणे ७३६, अहमदनगर ४५२, सोलापूर ४८०, नाशिक ५८७, धुळे २२८, जळगाव २९२, नंदुरबार १६१, कोल्हापूर ३७३, सातारा ३५१, सांगली ३०८, रत्नागिरी १८४, सिंधुदुर्ग १०५, औरंगाबाद ३७५, जालना १७०, बीड २८६, परभणी १३७, हिंगोली १००, अमरावती १८५, बुलडाणा २७१, अकोला १८७, वाशिम १२१, यवतमाळ १९५, नागपूर २८२, भंडारा १३४, गोंदिया १५४, वर्धा ६१, चंद्रपूर ११३, गडचिरोली ११, लातूर ३११, उस्मानाबाद १९३, नांदेड ३१९, मुंबई ९१५ एकूण ९५१५.

Web Title: Schools are the obstacles to the 'merit' of 22 thousand meritorious students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.