गणेशोत्सवात व्यसनांचे विसर्जन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:16 PM2017-08-19T21:16:08+5:302017-08-19T21:16:42+5:30
आगामी पोळा, बकरी ईद, गणेशोत्सवात सर्वधर्मीयांनी तारतम्य ठेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, सण-उत्सवात शांतता कायम रहावी म्हणून नागरिकांनी दहा दिवस उपवास करा,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : आगामी पोळा, बकरी ईद, गणेशोत्सवात सर्वधर्मीयांनी तारतम्य ठेऊन जबाबदारीने वागले पाहिजे, सण-उत्सवात शांतता कायम रहावी म्हणून नागरिकांनी दहा दिवस उपवास करा, सर्व व्यसनांचे गणेशोत्सवात विसर्जन करा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा, असे आवाहन आमदार मनोहरराव नाईक यांनी शनिवारी येथे केले.
पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित शांतता समितीच्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, तहसीलदार डॉ. संजय गरकल, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गणेश मंडळाची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी अनिवार्य असल्याचे सांगितले. नोंदणी न करणाºया मंडळाच्या अध्यक्ष, सचिवाविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दारुबंदी व जुगारबंदी असलीच पाहिजे, यासाठी एसडीओ आणि तहसीलदारांनी दररोज सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत शहरातील मंडळांना भेटी देऊन निरीक्षण करण्याची सूचना दिली. तसेच नागरिकांना अनुचित प्रकार आढल्यास त्यांनी आपल्याला अवगत करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी तर पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्टÑपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पुसदकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. पोलीस दलाच्यावतीने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष ताहेर खान पठाण यांनी मांडलेल्या गणेश मंडळात मुस्लीम बांधवांचा सहभाग या सूचनेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी अनिता रेवणवार, रेश्मा लोखंडे, सुधीर देशमुख, अनिल जोशी, भीमराव कांबळे, ताहेर खान पठाण, संजय हनवते, साहेब खान, शरद पाटील आदींनी सूचना मांडल्या. प्रास्ताविक ठाणेदार वाघु खिल्लारे यांनी संचालन प्रा. स्वाती दळवी व एपीआय गजेंद्र क्षीरसागर यांनी केले. यावेळी वसंतनगरचे ठाणेदार प्रकाश शेळके, ग्रामीणचे धनंजय जगदाळे, खंडाळाचे बाळू जाधवर, धीरज चव्हाण, दीपक आसेगावकर, मो. नदीम, महेश खडसे उपस्थित होते.