पोटची पोरं असूनही १३४० आईबाबा झाले बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:38 PM2019-02-10T23:38:36+5:302019-02-10T23:39:34+5:30

काल ज्यांनी गाजवला, आज त्यांनाच काळाने गांजवले. नुसत्या काळाने नव्हे, पोटच्या बाळाने त्यांना वाळीत टाकले. तळहातावरच्या फोडासारखे जपलेल्या मुलांनी तरुण झाल्यावर वृद्ध आईबाबांना बेवारस सोडून दिले.

Despite the child's stomach, 1340 parents became unemployed | पोटची पोरं असूनही १३४० आईबाबा झाले बेवारस

पोटची पोरं असूनही १३४० आईबाबा झाले बेवारस

googlenewsNext
ठळक मुद्देनोकरदार तरुणांची बेपर्वाई : ‘आई’च्या सर्वेक्षणात आढळले निराधार ‘बाप’, कुणी अपंग तर कुणी अगतिक

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काल ज्यांनी गाजवला, आज त्यांनाच काळाने गांजवले. नुसत्या काळाने नव्हे, पोटच्या बाळाने त्यांना वाळीत टाकले. तळहातावरच्या फोडासारखे जपलेल्या मुलांनी तरुण झाल्यावर वृद्ध आईबाबांना बेवारस सोडून दिले. एक दोन नव्हे, यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३४० असे वृद्ध आढळले, ज्यांची मुले श्रीमंत आणि कर्ती असूनही त्यांना रस्त्यावर, मंदिरात, बसस्थानकावर हात पसरून जगावे लागत आहे. समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवणाऱ्या ‘लेकरां’ची ही बेमुर्वत वागणूक ‘आई’ फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून चव्हाट्यावर आली.
गेले वर्षभर जिल्हा पालथा घालून आई मल्टिपर्पज फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अशा वृद्धांचा शोध घेतला. हे सर्वेक्षण नुकतेच आटोपले असून १३४० वृद्ध मुले असूनही बेवारस जगत असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, एकट्या यवतमाळ शहरात २५६ बेवारस वृद्ध आढळले. तर पुसद १९७, वणी ३०४, दारव्हा १७०, नेर ६९, कळंब १२७, पांढरकवडा १०४, राळेगाव ४२, आर्णी शहरात ७१ वृद्ध नोंदविण्यात आले. यात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक आहे, हे विशेष.
कार्यकर्त्यांना हे वृद्ध ज्या स्थितीत आढळले, ती भयंकर आहे. यवतमाळच्या बसस्थानकावर रात्रीच्या वेळी फक्त पदर अंगावर घेत झोपणारी आई आणि तिच्याच बाजूला अपंग बाप दिसला. ‘मुलगा सरकारी आफिसात काम करतो, पण आम्हाला जवळ ठेवत नाही. त्यामुळे दिवसभर पोट घेऊन आम्ही दर दर भटकतो आणि संध्याकाळी इथं येऊन राहतो...’ हे त्यांचे बोल संवेदनशील काळजांना रडविणारेच आहे. पण आमच्या मुलांची नावे कुणाला सांगू नका, असे या वृद्धांनी आवर्जुन बजावले. त्यामुळे मुलांची आणि वृद्धांचीही नावे फाऊंडेशनने उघड करण्यास नकार दिला.
कळंबच्या देवळात सापडलेला एक बाप म्हणाला, ‘मला एक पाय नाही. मुलाला नोकरी लागल्यानंतर त्याला मी एकच मागणे केले होते की, तू कुठेही गेला तरी मला विसरू नको. पण त्याच मुलाने मला घराच्या बाहेर काढून दिले.’ जनाबाई (बदललेले नाव) यवतमाळच्या महादेव मंदिराजवळ भटकताना आढळली. एकेकाळी घरी धनधान्य भरभरून असल्याची आठवण ती सांगते. सर्वेक्षकांनी तिच्या बोलणे सुरू केल्यावर मनाबाई काहीएक विचार न करता सर्वेक्षकांना बिलगून रडू लागली. ‘माझ्या लग्नाच्या वेळी हजारो लोकांना पुरणपोळीचा स्वयंपाक झाला होता. पण म्हतारी झाल्यावर मुलाने काढून दिले. मुलाला जेव्हा मी निरोप देते, तेव्हा मुलगा म्हणतो आम्ही बाहेरगावी आहोत. आम्ही आता फिरायला निघालो आहोत...’ ही व्यथा सांगणाºया आई मनाबाईने या वयातही डोक्यावरचा पदर मात्र खाली पडू दिलेला नाही. अन् कपाळावरचा कुंकवाचा टिळाही ती स्वाभिमानाने जपते. कळंब येथील चिंतामणी मंदिराच्या समोर विदारक सत्य पुढे आले. दहा एकर शेती असणारी म्हातारी एकेका रुपयासाठी रस्त्यावर भटकताना दिसली. ‘मला आता घरी जायचे नाही. पोटच्या मुलाने धक्के देत बाहेर काढले’ अशी सणक तिने बोलून दाखविली.
शासनाने जबाबदारी घ्यावी
जिल्ह्यात दोन वृद्धाश्रम आहेत. पण तेही फुल्ल आहेत. शिवाय, या वृद्धाश्रमात दाखल होण्यासाठी पुरावे द्यावे लागतात. यवतमाळलगतच्या निळोणा येथील वृद्धाश्रम फुल्ल आहे. तर आर्णी तालुक्यातील उमरी पठारच्या वृद्धाश्रमात शेषराव डोंगरे हे निराधार वृद्धांना स्वत:हून सामावून घेतात. सध्या येथे ९० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. अशावेळी आई फाऊंडेशनच्या सर्वेक्षणातून आणखी १३४० निराधार वृद्ध आढळले. शासनाने या वृद्धांची सोय करावी. खासगी संस्थांच्या भरवशावर न राहता शासनाने स्वत: या वृद्धांची जबाबदारी घ्यावी, असे मत फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा समता पर्वाचे अध्यक्ष अंकुश वाकडे यांनी व्यक्त केले.
‘आई’च्या सर्वेक्षणाचा गोषवारा
यवतमाळ, पुसद, वणी, दारव्हा, नेर, कळंब, पांढरकवडा, उमरखेड, पांढरकवडा, राळेगाव, आर्णी या ठिकाणी हे वृद्ध आढळले.
सर्वेक्षणात आढळलेल्या १३४० वृद्धांना मुले, मुली, सुना आहेत. पण ते या वृद्धांना सांभाळत नाहीत.
यातील ७४१ वृद्ध मंदिरांच्या आसऱ्याने जगत आहेत. ५९९ वृद्ध रस्त्यावर भटकतांना आढळले.

Web Title: Despite the child's stomach, 1340 parents became unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.