१३ दिवसांनी मंगरुळपीरचा पाणी पुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:58 PM2019-03-23T12:58:42+5:302019-03-23T12:59:00+5:30

मंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला.

After 13 days, the water supply of Mangarulpir is smooth | १३ दिवसांनी मंगरुळपीरचा पाणी पुरवठा सुरळीत

१३ दिवसांनी मंगरुळपीरचा पाणी पुरवठा सुरळीत

googlenewsNext

 
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): तब्बल १२ दिवसांपासून ठप्प असलेला मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा शुक्रवार २२ मार्च रोजी १३ व्या दिवशी सुरळीत झाला. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविलेली जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात लोकमतने १९ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करून नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.  
मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी ७९४.५३ मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के होते. त्यामुळेच तालुक्यातील जलाशय काठोकाठ भरले आणि यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे दिसू लागले; परंतु वाढलेले रब्बीचे क्षेत्र, पाण्याचा अवैध आणि वारेमा उपसा, तसेच रखरखत्या उन्हामुळे वेगाने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे तालुक्यातील १५ पैकी निम्मे जलाशय कोरडे पडले. तथापि, मंगरुळपीर शहरासह इतर काही खेडेगावांना पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पात अद्यापही ४० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासियांसह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खेडेगावांत पुरेसा पाणी पुरवठाही होत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जोडलेली जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आणि नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. शहरातील काही हातपंप बंद पडले असताना नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली होती. नगर पालिका प्रशासनाकडून मात्र, यावर तातडीचे उपाय करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसत होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने १९ मार्च रोजीच्या अंकात मंगरुळपीर शहराचा पाणी पुरवठा आठ दिवसांपासून ठप्प, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पालिका प्रशासनाचे नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले. प्रशासनानेही तातडीने दखल घेत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यात २१ मार्च रोजी पुन्हा शहरातील सांस्कृतिक भवनानजिक जलवाहिनी फुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागला. अखेर शुक्र वार २२ मार्च रोजी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  
 
जीर्ण जलवाहिनी बदलण्याची मागणी 
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाची जलवाहिनी दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांतच फुटण्याचे प्रकार घडतात आणि त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. यंदाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागला. त्यातच फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लीटर पाण्याचा अपव्ययही झाला. त्यावरून जलवाहिनी जीर्ण झाल्याचे स्पष्ट होत असून, ही जलवाहिनी बदलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

मोतसावंगा प्रकल्पावरून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली होती. ती दुरुस्त करण्यात आली असून, शुक्रवारपासूनच शहरातील सर्व ठिकाणचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळत पालिकेला सहकार्य करावे. 
-मिलिंद दारोकार
मुख्याधिकारी 
नगर परिषद मंगरुळपीर

Web Title: After 13 days, the water supply of Mangarulpir is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.