समुद्रपुरात भीषण पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:22 PM2019-04-16T21:22:26+5:302019-04-16T21:22:56+5:30

अत्यल्प पर्जन्यमानामुळे सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना आता समुद्रपुरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजनच्या विहिरीनेही तळ गाठल्याने नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

Severe water scarcity | समुद्रपुरात भीषण पाणी टंचाई

समुद्रपुरात भीषण पाणी टंचाई

Next
ठळक मुद्देचार दिवसाआड पाणी : नळ योजनेची विहीर कोरडीठाक

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : अत्यल्प पर्जन्यमानामुळे सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना आता समुद्रपुरातही पाणीबाणी निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी नळ योजनच्या विहिरीनेही तळ गाठल्याने नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पुढे यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने नगरपंचायतने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. सोबतच नागरिकांनीही पाणी बचतीकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
येथील नळ योजनेची विहीर कोरडी झाल्यामुळे शहराची तहान भागविण्याकरिता त्या विहिरीत दोन बोअरवेलचे पाणी साठविले जाते. पाणी साठविण्याकरिता ४ ते ५ तासाचा कालावधी लागतो. साठविलेले पाणी जलकुंभापर्यंत पोहोचण्याकरिता पुन्हा ५ तास लागतात. इतके करुनही केवळ दोन वॉर्डांना पुरेल इतकेच पाणी एका दिवसी साठविले जातात. परिणामी उर्वरित १३ वॉर्डाना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागते. वॉर्ड क्रमांक १४ मधील शिक्षक वसाहतीत एकमेव विहीर आहे. पण, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ती पुर्णत: कोरडी झाली आहे. त्यामुळे या परिसरात नगरपंचायतकडून केवळ एका पाण्याच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे याच भागातील बहुतांश नागरिकांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नळ जोडणी असलेल्या घरांना सुद्धा सहा महिन्यांपासून नियमित पाणी पुरवठा होत नाही. माजी नगराअध्यक्ष व विद्यमान नगरसेविका यांच्या वॉर्डात नळ जोडण्याच नसल्यामुळे पाणीपुरवठा होत नाही. घरगुती विहिरीही कोरड्या झाल्यामुळे ट्रँकरव्दारे थातुरमातूर पाणीपुरवठा होत आहे. शहरातील इतरही वॉर्डातील हीच अवस्था असल्याने नगरपंचायतकडून अद्यापही ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक विहिरी जलमय
इंग्रजांच्या राजवटीत तयार झालेल्या शहरातील लाल विहिरीला मुबलक पाणी आहे. पाणी टंचाईच्या काळात १९८६ मध्ये तत्कालीन सरपंच रमेश भोयर यांनी या विहिरीची पुनर्रचना करुन या विहिरीचे पाणी नळ योजनेच्या पाईपलाईला जोडून पाणी टंचाईवर मात केली होती. परंतु आता नगर पंचायत याच विहिरीवरुन टँकरव्दारे पाणीपुरवठा करीत आहे. मागील आठ दिवसांपासून या पाण्याची दुर्गंधी येत असल्याची ओरड होताच पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या विहिरीत सांडपाण्याचा पाझर जात असल्याचे निदर्शनास आले.
जनपत सभेच्या काळात डॉ. खुजे यांच्या घराजवळ, शंकर साळवे यांच्या घराजवळ, तहसील कार्यालयाच्या मागे, गजानन महाराज मंदिर परिसर, नगरसेवक रवि झाडे यांच्या घराजवळ अशा एकूण पाच विहिरीची निर्मिती करण्यात आली. या सर्वच विहिरीला आज मुबलक पाणी आहे. परंतु नगरपंचायत येथील पाणी शुद्ध करुन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात असमर्थ ठरत आहे.
शहरातील पाणी टंचाईवर मात करण्याकरिता दोन टंँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. हे पाणीही नगरपंचायत निखाडे यांच्याकडून विकत घेऊन नागरिकांना पुरवित आहे. शहरात मुबलक पाणी असतानाही नगरपंचायतकडून कृत्रिम पाणी टंचाई दाखवित असल्याचा आरोप नागरिक क रीत आहे.

पाणी टंचाईमुळे हागणदारी मुक्तीवर परिणाम झाला आहे. पाण्याच्या अभावामुळे शौचालयात एक बकेट पाणी टाकण्यापेक्षा एक लोटा पाणी घेऊन उघड्यावर जाणे कधीही चांगले. मात्र प्रशासन त्याला दंड ठोठावत असल्याने नागरिकांनी काय करावे हेच कळत नाही.
- संजित ढोके, अध्यक्ष, वाघाडी
फाउंडेशन.

लाल विहिरीवर ३ फेस कनेक्शन उपलब्ध आहे. परंतु त्या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे तेथून पाणीपुरवठा बंद केला. इतर विहिरीवर ३ फेस कनेक्शन नसल्यामुळे तेथून पाणी पुरवठा करण्यास अडचणीचे ठरत आहे. या संदर्भात तातडीची बैठक बोलावली असून येत्या चार दिवसात पाणी टंचाईचे नाराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- प्रविण चौधरी, पाणीपुरवठा सभापती न.प. समुद्रपूर.

Web Title: Severe water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.