कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज; व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:37 PM2018-02-26T13:37:05+5:302018-02-26T13:37:12+5:30

The need for continuous efforts to eradicate leprosy; Venkayya Naidu | कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज; व्यंकय्या नायडू

कुष्ठरोग निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज; व्यंकय्या नायडू

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठसेवा पुरस्काराचे वितरण डॉ. गुप्ते म्हणाले की, कुष्ठरोग निर्मूलन क्षेत्रात महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे मोठे योगदान आहे. कुष्ठरोग निर्मूलन क्षेत्रात आगामी काळात काम करताना सुदूर सर्वेक्षण, उपलब्ध मनुष्यबळाचा वापर, स्थानिक संबंधित संशोधनाचा वापर व किफायतशीर सेवा या डॉ. शहा म्हणाले की, कुष्ठरोग व कुष्ठ रुग्णांप्रती समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. कुष्ठरोगावरील उपचारात सर्वांगीण उपचार पद्धतीवर भर देण्याची गरज असून कुष्ठरुग्णांशी भेदभाव करण्यात येऊ नये.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाच्या अडीच लाख नवीन केसेस समोर येतात. पैकी ६० टक्के केसेस भारतातील असतात. तेव्हा भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. यासाठी समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे व रोग्यांना उपचार पुरविणे यास प्राधान्य देत कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनद्वारे आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार २०१७ च्या वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, संस्थेचे अध्यक्ष धिरू मेहता, जे.के. बांठिया, डॉ. बी.एस. गर्ग, पी.एल. तापडिया तथा पुरस्कार प्राप्त डॉ. अतुल शहा व डॉ. एम.डी. गुप्ते उपस्थित होते. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व सुशीला नायर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी सुतमाला अर्पण केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मूलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार २०१७ प्रदान करण्यात आला.
उपराष्ट्रपती नायडू यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, मानवसेवा हीच माधवसेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची गांधींची शिकवण होती. गांधींचे विचार आजही सुसंगत ठरतात. ‘खेड्यांकडे चला’, हा नारा महात्मा गांधींनी दिला. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रीत करणे गरजेचे आहे. खादी स्वावंलबन व साधेपणाचे प्रतीक आहे, असे स्वदेशीबाबत शिकवण देताना गांधींनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खादी उत्पादन मनरेगाशी जोडण्याची संकल्पना उपयुक्त ठरू शकते. प्राचीन परंपरा, संस्कृतीचे जतन केले पाहिजे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड केली पाहिजे. उज्वल भवितव्यासाठी निसर्ग व संस्कृतिचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर १९४७ च्या ‘हरिजन’ साप्ताहिकात गांधीजींनी, ‘कुष्ठरोग्यांची सेवा ही केवळ उपचारापूरती नाही तर त्यांचे पुनर्वसन, नैराश्य दूर करून त्यांना जगण्याचा आनंद घेता यावा यासाठीही आहे. अशा रोग्याचे जीवन जर बदलून टाकले तर तुम्ही खेड्यातच नव्हे तर राष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकाल’ असे लिहिले होते. १९४५ मध्ये प्रा. जगदीशन यांनी कस्तुरबा कुष्ठ निलयम या कुष्ठरोग्यांच्या निवासस्थानाचे उद्घाटन करण्यासाठी महात्माजींना निमंत्रित केले असता ते म्हणाले होते, ‘उद्घाटनासाठी तुम्ही अन्य कुणाला बोलवा; पण ते बंद करण्यासाठी मला बोलवा’.  कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था हा त्या समस्येवर तोडगा नाही, असेच त्यांनी सुचविले.
१९५० मध्ये स्थापन गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी करीत हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाउंडेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के होते. २०१२ पर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यांतून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश आले असले तरी नवी प्रकरणे पूढे येत आहे, याबाबत चिंता व्यक्त केली.
बिहार, महाराष्ट्र व प. बंगाल या राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले होते. अलीकडे या रोगाचा प्रादुर्भाव या राज्यांतही दिसून आला. २०१२-१३ मध्ये देशातील २०९ जिल्हे कुष्ठरोगाने बाधित होते. कुष्ठरोगाचा लवकर शोध घेणे व रोग्यांना उपचार पुरविणे या बाबीला प्राथमिकता दिली पाहिजे. रोगापेक्षा एक कलंक म्हणून रोग्याकडे बघितले जाते, ही चिंतेची बाब आहे. उपचाराबाबत अनभिज्ञता, रोगाबाबत भ्रामक कल्पना याचाच कुष्ठरोग्यांना त्रास होतो, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक मेहता यांनी केले. बांठिया व डॉ. गर्ग यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. संचालन डॉ. अनुपमा यांनी केले तर आभार तापडिया यांनी मानले.
 

Web Title: The need for continuous efforts to eradicate leprosy; Venkayya Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.