तूर व चण्यावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:35 PM2018-12-18T23:35:38+5:302018-12-18T23:36:14+5:30

जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

Green leafy season on tur and chana | तूर व चण्यावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव

तूर व चण्यावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देढगाळ वातावरणाचे दुष्परिणाम : दुर्लक्ष केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून तूर आणि चना पिकावर हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास सध्या थोड्या प्रमाणात दिसणाऱ्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव रौद्ररुप धारण करू शकते, असा असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी एकूण सहा लाख एक हजार ५३७ हेक्टरवर तुरीची लागवड केली. सध्या तूर पीक फूलावर असून शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. या पिकावर सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर आता हिरव्याअळीनेही या पिकावर आक्रमण केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ढगाळी वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल्यास ही परिस्थिती अधिक विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर चना पीक सध्या फुलोऱ्यावर आहे. सुरूवातीला ज्यांनी चन्याची लागवड केली त्यांच्या शेतातील उभे चना पीक सध्या घाट्या धरत असल्याचे दिसून येते. परंतु, याच पिकावर सध्या ढगाळी वातावरणामुळे हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सदर अळी ही सध्या चना पिकावर अगदी मुंगीच्या आकाराची असल्याचे कृषी तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे चना उत्पादनाकांनी तात्काळ कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

काही शेतकऱ्यांना बगळ्यावर विश्वास
चन्यावर सध्या हिरव्याअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या पाहणीत हे स्पष्ट झाले आहे. हिरव्याअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आवश्यक औषधांची फवारणी केली आहे. परंतु, काही शेतकरी सदर अळी बगळे खात असल्याने फवारणीची गरज नसल्याचे बोलतात. असे असले तरी हिरव्या अळीला वेळीच नियंत्रणात आणले नाही तर उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तापमान घसरल्याने तुरीवर विपरीत परिणाम
जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय दिवसेंदिवस तापमानात घट होत असून १० डिग्री पेक्षा कमीचे तापमान तूर पिकावर विपरीत परिणाम करणारे ठरते. काही शेतातील तूर पीक वाळत असल्याचे तसेच शेंगा पूर्णपणे भरत नसल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले आहे. तुरीला रात्रीचे तापमान १० डिग्रीपेक्षा कमी झालेले मानवत नाही. शिवाय इजा पोहोचून मर सुरू होते. हे टाळण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी सायंकाळी उशीरा शेतात कोपऱ्यामध्ये शेकोटी पेटवावी. हा साधा प्रयोग फायद्याचा ठरणारा असल्याचे सांगण्यात येते.
१३,१३९ हेक्टरवर गहू तर ३४,५७९ हेक्टरवर चण्याची लागवड
यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकºयांना चांगलाच फटका सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. त्यातच समाधानकारक पाऊस न झाल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेऱ्यात घट झाली आहे. यंदा १३ हजार १३९ हेक्टरवर गव्हाची तर ३४ हजार ५७९ हेक्टरवर चन्याची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागात क्लोरोफायरीफॉस ५० टक्के अनुदानावर उपलब्ध
तूर व चन्यावरील हिरव्याअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्लोरोफायरीफॉस आणि क्विनॉलफॉसची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात पिकावर करावी. सध्या क्लोरोफायरीफॉस कृषी विभागाकडे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. त्याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Green leafy season on tur and chana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.