देशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:50 AM2018-10-15T00:50:05+5:302018-10-15T00:50:32+5:30

स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

Demonstrate patriotism | देशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा

देशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा

Next
ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : आधार फाऊंडेशनचा माँ राणी कला महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
येथील आधार फाऊंडेशन व्दारा आयोजित माँ राणी कला महोत्सवात विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष हेमंत गडकरी, उद्योजक शंकर गुल्हाने, महेश गुल्हाने, अशोक चांडक, राहुल शर्मा, दीपक मांडवकर, प्रमोद श्रीराव, देवा निखाडे, किशोर गुजरकर, माया उमाटे, मोना किंमतकर, आशिष आकरे, स्नेहा आकरे, सुधीर चाफले, अशोक वांदिले, आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना अनासपुरे म्हणाले की, समाजात आज सुसंवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होत आहे. समाजाचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद ठेवावा लागेल. समाजात आज चांगलं काम करणाºयांची संख्या अतिशय कमी आहे. अशा सर्व लोकांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय समाजाचं भलं होणार नाही.
शेतात राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच पाहीजे. शेतकºयांमुळेच आज आपण जीवंत आहोत, त्यांनी जर शेती करणे सोडले तर आपल्या जवळ कितीही पैसा असू द्या, आपण जीवंत राहू शकणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखा, समाधानानं जगला पाहीजे याची काळजी समाजाने व शासनाने घेणे गरजेचे असल्याचेही अनासपूरे यांनी सांगितले.
युवकांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, हुंडा घेवू नका, कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चांगले संस्कार स्वत:च्या अंगी निर्माण करून देश सेवेसाठी आपण पुढे आले पाहीजे. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा समाजासाठी आपण काय करतो? याचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विदर्भाविषयी ते म्हणाले की, विदर्भाची भूमी ही सुपीक आहे आणि त्यामुळेच इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा होवून गेल. असे सांगत या संताच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग त्यांनी विषद केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माधुरी विहिरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार निलेश गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार फाऊंडेशनच्या विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील विविध भागातून नागरिकांची मोठी गर्दी होती. आयोजन समित्यांनी उत्तम नियोजन केल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
समाजहितार्थ कार्याचा झाला गौरव
पर्यावरण विषयासंदर्भातही अनासपुरे यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी झाडांचे महत्व विषद करताना झाड स्वत: काही न मागता समाजाला सतत ते काही न काही देत असतात, त्यामुळे आपणही समाजाला काही तरी दिलं पाहीजे अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान मान्यवराच्या हस्ते समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. त्यामध्ये पुरात बस मध्ये अडकलेल्या प्रवाश्यांचे जीव वाचविणाºया सातेफळ येथील ग्रामस्थांचा मकरंद अनासपुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी हेमंत गडकरी यांनीही मार्गदर्शन करुन कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Demonstrate patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.