ट्रेण्ड कोणताही येवू देत आपल्या देशातली ही दहा ठिकाणं पर्यटनाच्या जगात ‘आॅल टाइम हिट’ आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:50 PM2017-08-24T17:50:42+5:302017-08-24T18:02:37+5:30

भारतातली काही पर्यटनस्थळं आहेत, जी आजही पर्यटकांची पहिली पसंती असतात. ज्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम आहे अशा या ठिकाणांना आपण ‘एव्हरग्रीन टूरिस्ट स्पॉट’ही म्हणू शकतो.

10 places in India are always hit in travel and tourism | ट्रेण्ड कोणताही येवू देत आपल्या देशातली ही दहा ठिकाणं पर्यटनाच्या जगात ‘आॅल टाइम हिट’ आहेत.

ट्रेण्ड कोणताही येवू देत आपल्या देशातली ही दहा ठिकाणं पर्यटनाच्या जगात ‘आॅल टाइम हिट’ आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्दे* आमेर किल्ला, जयपूर. केवळ देशीच नाही तर परदेशी पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण. त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.* मध्यप्रदेशच्या रायसीन जिल्ह्यात सांची नावाचं हे छोटंसं गाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे ते इथल्या बौद्ध स्तूप आणि अशोकस्तंभामुळे.* भारतात राहून फ्रेंच संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर पॉण्डिचेरीला जायला हवं. भारंभार स्थळं बघत पायपीट करायची, मग खूप शॉपिंग करायची आणि परतायचं अशा छापाची ट्रीप नको असलेल्या पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण.

 

- अमृता कदम


आजकाल प्रवासाचे ट्रेण्ड बदलत चालले आहेत. पर्यटकांचा कल हटके डेस्टिनेशन्सला भेट देण्याकडेही वाढत आहे. पण तरीही भारतातली काही पर्यटनस्थळं आहेत, जी आजही पर्यटकांची पहिली पसंती असतात. ज्यांची लोकप्रियता वर्षानुवर्षे कायम आहे अशा या ठिकाणांना आपण ‘एव्हरग्रीन टूरिस्ट स्पॉट’ही म्हणू शकतो.

 

1. आमेर किल्ला (जयपूर)

केवळ देशीच नाही तर परदेशी पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण. त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. किंबहुना जोधा-अकबर या लोकप्रिय चित्रपट आणि मालिकेनंतर तर आमेरचा किल्ला प्रत्यक्ष पाहण्याच्या उत्सुकतेनं अनेकांचे पाय जयपूरकडे वळले. आजही अत्यंत उत्तम अवस्थेत असलेला हा किल्ला राजपूतांच्या शाही जीवनशैलीचं दर्शन आपल्याला घडवतो. हा किल्ला हिंदू आणि मुघल स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे. अकबराची पत्नी जोधाबाईचं माहेर एवढीच माहिती आपल्याला या किल्ल्याबद्दल असते. पण आमेरच्या किल्ल्यावर दररोज संध्याकाळी होणारा लाईट अ‍ॅण्ड साउण्ड शो या किल्ल्याचा समृद्ध इतिहास उलगडून दाखवतो. आणि या डोळे दिपवणारा ‘लाईट अ‍ॅण्ड साउण्ड शो’ (हिंदी भाषेतला) गुलजारांच्या लेखणीतून उतरला आहे आणि त्याला आवाज आहे महानायक अमिताभ बच्चन यांचा. एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यावर पर्यटकांचा ओढा या किल्ल्याकडे का नसेल?

2. हंपी ( कर्नाटक)

तुंगभद्रा नदीच्या किना-यावरचं हे ठिकाण. विजयनगर साम्राज्याची ही राजधानी. आज जरी इथे बरीचशी मंदिरं भग्नावस्थेत असली तरी एकेकाळचं त्यांचं वैभव लपून राहत नाही. म्हणूनच युनेस्कोनं या स्थळाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. एकेकाळच्या प्राचीन आणि वैभवशाली संस्कृतीला जाणून घेण्यासाठी अनेक पर्यटक हंपीला भेट देतात. इतिहास, पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासकांसाठी तर हंपी कायमच पहिली पसंती आहे.

3. कॅथलिक वर्ल्ड ( गोवा)

एरवीही गोव्याला पर्यटकांची पसंती असते. त्यातही गोव्यातली अशी काही ठिकाणं आहेत, जी तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये अजिबातचच चुकवू शकत नाही. त्यापैकीच एक म्हणजे कॅथलिक वल्ड,र् गोवा. इथे सेंट फ्रांसिसि झेवियरचे दफन करण्यात आलं होतं. इथल्या आसपासच्या भागात आजही पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पहायला मिळतात. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा प्रसिद्ध आहेच. पण कॅथलिक वर्ल्ड परिसरात तीन दिवसांचा गोवा कार्निव्हल आणि सेंट फ्रान्सिस पर्व खूप उत्साहानं साजरं करण्यात येतं. याशिवाय गोव्याची अंजुना, कँडोलीम सारखी प्रसिद्ध बीचेसही आहेतच.

 

4. सांची (मध्ययप्रदेश)

मध्यप्रदेशच्या रायसीन जिल्ह्यात सांची नावाचं हे छोटंसं गाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे ते इथल्या बौद्ध स्तूप आणि अशोकस्तंभामुळे. या स्तुपाला चार प्रवेशद्वार आहेत. त्यातल्या प्रत्येक द्वारावर बौद्धकालीन घटना, मिथकं कोरलेली आहेत. सांचीचा हा स्तूप गौतम बुद्धाच्या आयुष्यातले अनेक प्रसंग आपल्याला उलगडून दाखवतो. सांचीचा स्तूप युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट केलेला आहे. मध्यप्रदेशमधल्या अभयारण्यांमध्ये ‘टायगर टूरिझम’साठी जेवढ्या आवर्जून पर्यटक येतात. तेवढ्याच आवडीने सांचीमधला हा बौद्धकालिन इतिहास आणि संस्कृतीचा ठेवा पाहण्यासाठीही पर्यटक हजेरी लावतात.
 

5. पॉण्डिचेरी

भारतात राहून फ्रेंच संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर पॉण्डिचेरीला जायला हवं. भारंभार स्थळं बघत पायपीट करायची, मग खूप शॉपिंग करायची आणि परतायचं अशा छापाची ट्रीप नको असलेल्या पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण. सुंदर, शांत आणि निवांत. इथले चार प्रसिद्ध बीच आहेत. प्रोमिनेंट बीच. पॅराडाइज बीच, अरोविले बीच आणि सॅरीनीटी बीच. या सुंदर समुद्रकिना-यावर योगा करण्याची एक वेगळीच मजा आहे. इथल्या अरविंद आश्रमाला भेट दिल्यावर तुम्हाला मन:शांतीची अनुभूती येते. जगभरातून लोक इथल्या आध्यात्मिक वातावरणात रहायला येतात. रोजच्या धकाधकीपासून दूर घेऊन जाणा-या या ठिकाणाला म्हणूनच पर्यटकांची पसंती मिळते.
 

6

लेपाक्षी ( आंध्रप्रदेश)

या यादीमध्ये हे काहीसं अपरिचित नाव वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे गाव ऐतिहासिक आणिपुरातत्वाच्या दृष्टिने महत्त्वाचं गाव आहे. विजयनगर साम्राज्याचा वारसा सांगणारी अनेक मंदिरं इथे आहेतच. पण त्याचबरोबर कुतूबशाही आणि मुघलकालीन इतिहासाचा वारसा सांगणा-या वास्तूही आहेत. इथे येणा-या पर्यटकांच्या मते या ठिकाणी आल्यावर आजही प्राचीन भारताचा फील घेता येतो.

7. मराठा पॅलेस, दरबार हॉल

हे ठिकाण भारतातल्या सर्वांत जुन्या शहरांपैकी एक आहे. कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम इथे पहायला मिळतो. माता कावेरीचं एक प्राचीन मंदिर या शहरात आहे. त्याशिवाय ग्रॅण्ड एनाइकट, द बिग टेंपल, सर्फोजी महाल वाचनालय अशी ठिकाणंही या स्थळाची महती सांगतात. इथे अनेक चविष्ट दाक्षिणात्य पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतात. आणिन हो, सांबरचा उगमही इथलाच आहे.

 

8. सायन्स सिटी (कोलकाता)

कोलकात्याला कोणत्याही कारणासाठी गेलेला पर्यटक असो सायन्स सिटीला भेट द्यायला विसरत नाही. हे भारतीय उपखंडातलं सर्वांत मोठं वैज्ञानिक केंद्र आहे. इथलं फ्रेश वॉटर अ‍ॅक्वेरियम, लाइव्ह बटरफ्लाय एनक्लेव्ह, अर्थ एक्सप्लोरेशन हॉल, स्पेस ओडेसी बिर्ला प्लॅनेटोरियम ही इथली महत्त्वाची ठिकाणं. सायन्स सिटीला भेट देण्यासोबतच कोलकत्यातलं अजून एक आकर्षण म्हणजे इथे अजूनही जतन करु न ठेवलेली ट्राम. ट्रामची सफर तुम्हाला आठवणींच्या प्रदेशात घेवून जाते.

9. खजुराहो (मध्य प्रदेश)

देशातच नाही तर जगभरात खजुराहोची कीर्ती पसरलेली आहे. इथली प्राचीन मंदिरं ही हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. ही मंदिरं चंदेल राजांच्या काळात बांधली गेली. या मंदिरांवरची शिल्पं ही वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत. कारणं काहीही असली तरी या शिल्पांची प्रमाणबद्धता, सौष्ठव, कोरीवकाम तुमची नजर बांधून ठेवतं. आपल्या याच सौंदर्यामुळे इतिहासकारांच्याच नाही तर सामान्यांसाठीही खजुराहो कुतूहलाचा विषय आहे.

 

 

10. जोधपूर

या शहराला ‘थरचं प्रवेशद्वार’ असं म्हटलं जातं. कारण इथूनच थरच्या वाळवंटाला सुरूवात होते. त्यामुळेच इथलं हवामान कायमच उष्ण असतं. तरीही या शहराकडचा पर्यटकांचा ओढा कमी होत नाही. या शहराला ब्लू सिटी म्हणूनही ओळखलं जातं. केलाना झील, जनाना महाल, जसंवत सागर बांध ही इथली प्रमुख ठिकाणं. पण जोधपूरचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे वाळंवटातल्या आयुष्याची झलक तुम्हाला पाहायला मिळते. राजस्थानी संगीत, खाणं यांचा पुरेपूर आनंद इथे पर्यटक उपभोगतात.
यातली अनेक ठिकाणं तुम्हाला कदाचित फारशी परिचित नसतील. पण जातिवंत ‘भटक्या’ पर्यटकांच्या यादीत त्यांचा समावेश नेहमीच असतो. त्यामुळेच तर ही ठिकाणं गेली अनेको वर्षे पर्यटकांमधली आपली लोकप्रियता टिकवून आहेत.

 

Web Title: 10 places in India are always hit in travel and tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.