ठाणे: खूनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच बसून होती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 09:05 PM2018-03-22T21:05:00+5:302018-03-22T21:05:00+5:30

खूनानंतर विमानाने बंगलोरला पळालेल्या महिलेचा हवाई प्रवासानेच ठाणे पोलिसांनी माग काढून अवघ्या काही तासातच जेरबंद केले.

Thane: Three hours after murder, she was sitting near the dead body .... | ठाणे: खूनानंतर तीन तास ‘ती’ मृतदेहाजवळच बसून होती....

ठाणे पोलिसांनी केला ‘हवाई’ गतीने तपास

Next
ठळक मुद्देअनैतिक संबंधातून तरुणाचा खूनमहिलेला पोलीस कोठडीठाणे पोलिसांनी केला ‘हवाई’ गतीने तपास

ठाणे: अनैतिक संबंधानंतर लग्नाला नकार देणाऱ्या कबीर अहमद लष्कर (२५) या तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्यानंतर त्याच्याच मृतदेहाजवळ तीन तास बसून काढल्यानंतर भानावर आलेल्या रुमा बेगम लष्कर (२८) हिने बंगलोरला पळ काढला. तिला बंगलोरमधून ठाणे पोलिसांनी अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले. कबीर हा रुमाबेगम हिचा पती अन्वर हुसैन याच्या जिगनी (जि. अनिकल, कर्नाटक) येथील सायकल दुकानात नोकरीला होता. त्यामुळेच त्याची आणि रुमाबेगमची ओळख झाली होती. त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाल्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. दरम्यान, तो कर्नाटकातून ठाण्यात आला आणि घोडबंदर रोडवरील एका दुकानात नोकरीला लागला. ‘माझ्याशी लग्न करायचे असेल तर कर्नाटकातील घरदार सोडून तू ठाण्यात ये,’ असे त्याने तिला प्रलोभन दाखविले. ठरल्याप्रमाणे ती १६ मार्च रोजी ठाण्यात आली. मात्र, त्याने लग्नाला नकार दिला. १७ मार्च रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. याच रागातून तिने १८ मार्च रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झोपेतच त्याच्या डोक्यात वीट टाकून त्याला जखमी केले. झोपेतून जाग आल्यावर तो तिला मारण्यासाठी झेपावल्यानंतर तिने चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केला. नंतर गळाही आवळला आणि तो जिवंत राहू नये म्हणून उंदीर मारण्याचे औषधही त्याच्या तोंडात कोंबले. या झटापटीत त्याचा मृत्यु झाला. विशेष म्हणजे खूनानंतर त्याच्या मृतदेहाजवळ पहाटे ५ वाजेपर्यंत तिने बसून काढले. भानावर आल्यावर स्वत:च्या रक्ताचे डाग पुसण्यासाठी आंघोळ करुन पहाटेच त्याचे घर सोडले. ठाण्यातून पुणेमार्गे बंगलोर येथून ती जिगनी गावी परतल्याची कबूली तिने पोलिसांना दिली. कबीरला त्याच्या ठाण्यातील सायकल दुकानाचा मालक शोधत त्याच्या घरी आला, त्यावेळी त्याचा खून झाल्याचे उघड झाले. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि वैभव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कैलास टोकले, उपनिरीक्षक रुपाली रत्ने, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील, रविंद्र रावते, पोलीस नाईक प्रविण घोडके, संदीप सुरवसे आणि दिपक बरले आदींच्या पथकाने थेट विमानाने बंगलोर गाठून अवघ्या काही तासांतच तिला अटक केली. सुरुवातीला या खूनाशी संबंध नसल्याचा दावा करणा-या रुमाबेगमने नंतर अखेर या खूनाची कबूली दिली. कबीरने लग्नाच्या नावाखाली आपला विश्वासघात केल्यानेच त्याचा खून केल्याची कबूलीही तिने दिल्याचे उपायुक्त लोखंडे यांनी सांगितले. तिच्याकडून खूनातील चाकू आणि वीट हस्तगत करण्यात आले असून तिला सात दिवसांची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने दिली आहे.

ओळख न पटण्यासाठी कागदपत्रे नेली...

खूनानंतर कबीरची कोणतीही ओळख पटू नये म्हणून रुमाने त्याचे आधार आणि पॅनकार्डही बैंगलोरला जातांना घेऊन गेली. बैंगलोरला पोहचल्यानंतर आता आपल्यापर्यंत कोणी पोहचू शकणार नाही, अशा अविर्भावात असलेल्या रुमाला पोलिसांनी तिच्या पाठोपाठ विमानाने जाऊन तिला पकडल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला.
........................
कोणताही धागादोरा नसतांना..

कबीर याचा खून झाल्यानंतर त्याचा खून एका महिलेने केल्याची शक्यता वर्तविली जात होती. तीन दिवसांपूर्वीच एक महिला त्याच्या घरी आली होती. इतकीच त्रोटक माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. विशेष म्हणजे बेंगलोर येथून आलेली रुमाबेगम यापूर्वी कधीही ठाण्यात आली नव्हती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तिला जेरबंद केले.

Web Title: Thane: Three hours after murder, she was sitting near the dead body ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.