निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:36 AM2019-03-16T00:36:21+5:302019-03-16T00:36:37+5:30

नगरसेवकपद रद्दबाबत झाली सुनावणी, शेवटची संधी दिली जाणार

Delay from municipal administration to decide | निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सात नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठीच्या प्रलंबित तक्रारींवर सात महिन्यांनी शुक्रवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी सुनावणी घेतली. त्यात लवकरच शेवटची संधी म्हणून एक अंतिम सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले. तर, सुनावणी लवकर आटोपून निर्णय देण्यास मुद्दाम विलंब लावला जात असल्याचा सूर तक्रारदारांनी लावला आहे.

मीरा रोडच्या साईबाबानगर येथे पती दीपकने बेकायदा बांधकाम केले म्हणून भार्इंदर पूर्व प्रभाग-५ मधील भाजपा नगरसेविका मेघना रावल यांचे पद रद्द करण्याबद्दल झालेल्या सुनावणीवेळी रावल या हजर होत्या. तर, सुनावणीची माहितीच आपल्याला दिली नव्हती, असे तक्रारदार इरबा कोनापुरे यांनी सांगत आपण हजर राहू शकलो नसल्याचे स्पष्ट केले. रावल व आपले म्हणणे आधीच सादर केले असताना अजून निर्णय मात्र दिला जात नसल्याबद्दल कोनापुरे यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी सात महिन्यांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती. नगरसेवकांना वाचवण्यासाठी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत यात मोठा आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना, अशी शंका तक्रारदार घेत आहेत.

भाजपा नगरसेविका नीला सोन्स व विजय राय यांनी आजच्या सुनावणीला दांडी मारत पत्र देऊन पुढची तारीख मागितली. मीरा रोडच्या कनकिया भागात सोन्स व राय यांनी कार्यालय, वाचनालयाचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार आहे. तक्रारदार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा मात्र उपस्थित होते.

पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवरील बेकायदा पक्ष कार्यालयाचे बांधकाम केल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे सुनावणीला आले नसले, तरी त्यांनी आपले लेखी म्हणणे आधीच दिले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील उपस्थित होत्या. पाटील यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत पडताळणी करा, असे म्हटले. त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. तक्रारदार भरत मोकल यांनी २०१६ पासून आपण तक्रार करत असताना आधीही सुनावणी घेऊन नगरसेवकांना पाठीशी घातले जात असल्याचे नमूद केले.
काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी माहिती लपवल्याने पद रद्द करण्याची तक्रार करणारे पराभूत उमेदवार साबीर शेख व साजी आयपी उपस्थित होते. तिघांचेही म्हणणे आधीच दिलेले आहे. पण, अजून निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे नरेश पाटील यांनी सुनावणीवेळी आपले वकील नसल्याचे सांगत पुढील तारीख मागितली. वेगवेगळी जन्मतारीख आणि शिक्षणाच्या माहितीतली तफावतप्रकरणी पद रद्द करा, अशी भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुरेश येवले यांची तक्रार आहे.

लेखी दिले, आता निर्णय द्या
एकूणच सर्व सुनावण्या झाल्या असल्या, तरी कोणी हजर तर कोणी गैरहजर असल्याने आणखी एक शेवटची सुनावणी घेण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. स्वत: सचिव वासुदेव शिरवळकर यांनीही एक सुनावणी लवकरच घेतली जाईल, असे सांगितले. ज्यांची सुनावणी होऊन लेखी म्हणणे मांडले आहे, त्यासाठी सुनावणी न घेता निर्णय घेण्याची मागणीही काही तक्रारदारांनी केली आहे.

Web Title: Delay from municipal administration to decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.