आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

By Admin | Published: February 16, 2015 10:07 PM2015-02-16T22:07:27+5:302015-02-16T23:12:18+5:30

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत

Start the project in Ambali | आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

आंबोलीतील प्रकल्प सुरू करा

googlenewsNext

महादेव भिसे -आंबोली हे राज्यात थंड हवेचे ठिकाण तसेच उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे येथील पर्यटन प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. याचा परिणाम येथील पर्यटकांच्या उपस्थितीवर होत आहे. एकीकडे पर्यटनातून समृद्धी आणण्याच्या आणाभाका घेतल्या जात असताना, आंबोलीतील बंद पर्यटन प्रकल्पांकडे मात्र, दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील बंद पर्यटन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
आंबोलीला २००५ साली कोकण पॅकेजच्या माध्यमातून सुमारे चार कोटी निधी देण्यात आला होता. परंतु गचाळ नियोजनामुळे हा निधी अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आला. यात जंगल सफारी रस्त्यासाठी २५ लाख, पर्यटन महामंडळाच्या इमारती उभारणीसाठी पावणेदोन कोटी, हर्बेरिअम सेंटरसाठी ६० लाख, नांगरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम व मुख्य धबधबा नूतनीकरणासाठी मिळून दोन कोटी रुपये खर्ची घालण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, यातला एकही प्रकल्प पूर्ण न करताच निधी खर्च करण्यात आला. आज दहा वर्षानंतरही हे प्रकल्प बंद अवस्थेत आहेत.
यातल्या हर्बेरिअम सेंटर, फुलपाखरू उद्यान, पर्यटन महामंडळाच्या इमारतीत सध्या कुत्री, गायी वास्तव्यास असतात. याबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थ सांगतात. इतके सगळे जुने प्रकल्प बंद अवस्थेत असताना बांधकाम विभाग, वनविभाग व पर्यटन महामंडळ मिळून आणखी अनावश्यक पर्यटन प्रकल्प आंबोलीवर लादत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कावळेशेत येथे बांधण्यात आलेली व्हीव्हीएम मेलरी. मुळातच खाली उभे राहून सुंदर नजारा दिसत असताना बांधकाम विभागाने पंधरा लाख रुपये खर्चून अक्राळविक्राळ अशी इमारत या पर्यटनस्थळावर उभारली. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यच नष्ट झाले आहे.
आंबोलीतील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळांवर चेंजींग रूम व शौचालय उभारण्यात आली. परंतु ही शौचालये व चेजींग रुम एकदाही कामी न येता त्याची मोडतोड झाली आहे. काहींचे दरवाजे गायब आहेत, तर पाणीच नसल्याने याचा कुणी वापरही करताना दिसत नाही. सौरउर्जेवर चालणारे दिवेही सर्व पर्यटनस्थळांवर उभारण्यात आले होते. लाखो रुपये खर्चून
उभारण्यात आलेल्या या दिव्यांच्या बॅटरी व सोलर पॅनलच एका महिन्याच्या आत चोरट्यांनी आणि अतिउत्साही पर्यटकांनी
लांबविल्या.
नूतनीकरण असो वा नव्या प्रकल्पांची उभारणी, आंबोली म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. गेल्या दहा वर्षांत शासनाच्या अनेक विभागांकडून कोट्यवधी रुपये गडप करण्यात आले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणायचा आणि ठेकेदार व संबंधित विभाग यांनी संगनमत करून तो निधी गडप करायचा, असा जणू सपाटाच आंबोलीत सुरू आहे. याउलट पर्यटनाचा गाजावाजा करणारे सिंधुदुर्गचे प्रशासनाला वारंवार आंबोलीत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याची आठवण करून देऊनही अद्याप शौचालय उभारण्यात आलेले नाही. आंबोली रहिवाशी हॉटेल्सची शौचालये वगळता एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने पर्यटकही आंबोलीत थांबेनासे झाले आहेत.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
आंबोली ग्रामपंचायत तर पर्यटनाशी आपले काही देणेघेणे नसल्याप्रमाणे वागत आहे. ग्रामपंचायत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेसुमार निधी अनावश्यक ठिकाणी खर्च करताना दिसत आहे. परंतु पर्यटनासाठी आवश्यक बाबींवर एकही रुपया खर्च करताना दिसत नाही.
आंबोलीतील व्यावसायिकही पर्यटन विकासाच्या दृष्टीने उदास असल्याचे चित्र आहे. आंबोलीचा इतिहास पाहता आंबोलीत गेल्या दहा वर्षांत पर्यटनस्थळांची व येणाऱ्या पर्यटकांची अधोगतीच झाल्याचे दिसते.
यावर स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला असून, येत्या काळातील पर्यटन विकासकामे जर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना घेऊन करण्यात आली नाही, तर सर्वच्या सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.

Web Title: Start the project in Ambali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.