कणकवलीचे भूषण ‘संतांचा गणपती’

By admin | Published: September 9, 2016 11:49 PM2016-09-09T23:49:51+5:302016-09-10T00:14:33+5:30

वैशिष्ट्यपूर्ण उत्सवात अनेकांची सेवा : मातीच्या २१ गोळ्यांपासून गणेशाची निर्मिती --मंतरलेले दिवस

Santakarta Ganesha of Kankavali | कणकवलीचे भूषण ‘संतांचा गणपती’

कणकवलीचे भूषण ‘संतांचा गणपती’

Next

सुधीर राणे --कणकवली टेंबवाडी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला तसेच कणकवलीचे भूषण असलेला ‘संतांचा गणपती’ वैशिष्टयपूर्ण असाच आहे. गणेश चतुर्थी दिवशी या गणरायाची विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच जणू भक्तिरसाने भारावुन जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार मोठे महत्त्व आहे. गणेश चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणल्यानंतर दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस, बेचाळीस दिवसांपर्यंत आपापल्या घरातील पूर्वांपार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे भक्तिभावाने त्याचे पूजन केले जाते.
घरोघरी गणरायाचे पूजन केले जात असले तरी संतांच्या या गणपतीकडील वातावरण तसेच तेथे दर्शनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांचा उत्साह पाहिला की, या घरगुती गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवासारखे स्वरूप आल्याचे आपल्या लक्षात येते. संत पायाजी सावंत यांचे नातू जगन्नाथ महादेव सावंत यांच्या कुटुंबीयांबरोबरच कणकवली शहरातील अनेक भाविक कणकवलीचे भूषण असलेल्या या गणरायाची अनंत चतुर्दशीपर्यंत आपापल्या परीने सेवा करीत असतात.
या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे मातीच्या एकवीस गोळ्यांपासून दरवर्षी या गणेशमूर्तीची निर्मिती केली जाते. कणकवली टेंबवाडीबरोबरच शहरातील बालगोपाल मंडळी आपल्या कला नैपुण्यातून ही मूर्ती बनवितात. सुमारे सहा फूट उंच असलेली व उंदरावर विराजमान झालेली ही गणेशमूर्ती अत्यंत सुबक दिसते.
साधारणत: श्री गणेशाचे दोन रंग असतात. एक म्हणजे केशरी रंग हा श्री गणेशाचे तारक रूप दर्शवितो, तर लाल रंग हा शक्तीच्या म्हणजेच मारक रूपाच्या उपासनेचा आहे. संतांच्या या गणपतीच्या संपूर्ण शरीराला लाल रंग असतो. त्याच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात. तसेच मूर्ती जागृत व्हायला मदत होते. असे या गणपतीच्या रंगाबद्दल सांगितले जाते.
संपूर्ण शरीराला लाल रंग, पिवळे पीतांबर परिधान केलेली, डोक्यावर सोनेरी मुकुट धारण केलेली व कानावर पोपट धारण केलेली अशी संतांच्या गणपतीची मूर्ती बनविलेली असते. ही मूर्ती घरीच म्हणजे टेंबवाड़ी येथील सावंत कुटुंबीयांच्या श्री गणेश मंदिरात बनविली जाते.
सुरुवातीला सात दिवस ठेवण्यात येणारा हा गणपती नंतर नऊ दिवस व आता तर अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवण्यात येतो. या दिवशी मोठ्या भक्तिभावाने या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.
सुमारे दीडशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा लाभलेला हा श्री गणपती भाविकांच्या नवसाला पावतो, अशी अनेकांची श्रध्दा आहे. त्यामुळे त्याची ख्याती सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच मुंबईसह सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत याठिकाणी दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी व नवीन नवस बोलण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
श्री गणेश चतुर्थीपासून अनंत चथुर्दशीपर्यंत चालणाऱ्या येथील गणेशोत्सवात अनेक धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी संपूर्ण रात्र हरिनामाने रंगून निघते. रात्रभर विविध भजनी मंडळे भजनामध्ये, तर कणकवली शहरातील काही मंडळे श्रींच्या आरतीमध्ये दंग झालेली येथे पहावयास मिळतात.
या दिवशी परंपरेप्रमाणे श्री गणपतीचा प्रसाद म्हणून दुधात इतर साहित्य घालून बनविलेली ‘भांग’ दिली जाते. जिला ‘सब्जी’ असेही संबोधले जाते.


संतांच्या गणपतीचा इतिहास !
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावातील मूळ रहिवासी असलेले संत पायाजी बाळाजी सावंत विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पायी चालत पंढरीची वारी करण्यात त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. ज्यावेळी ते पंढरपूरला पायी जात असत त्यावेळी कणकवली बसस्थानकाशेजारील सोनगेवाडी येथे त्यांचा मुक्काम असे. संत पायाजी सावंत यांची तेथे कीर्तने तसेच प्रवचने होत असत.
कणकवलीतील राणे (पटेल) तसेच इतर गावकरी मंडळींनी त्यांना टेंबवाडी येथे निवास करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन संत पायाजी सावंत यांनी टेंबवाडी येथे वास्तव्य केले. त्यानंतर प. पू. साटम महाराज यांच्या सांगण्यावरून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाडी येथे गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून संतांचा गणपती अशी त्याची सर्वत्र ख्याती झाली.


थाटात विसर्जन मिरवणूक
टेंबवाडीवासीयांबरोबरच शहरातील अनेक भाविक या गणपतीच्या सेवेत आपले योगदान दरवर्षी देत असतात. त्यामुळे हा बालगोपाळांचा गणपती म्हणूनही ओळखला जातो. मोठ्या लाकडी मंचकावर विराजमान झालेल्या या गणरायाची विसर्जन मिरवणूकही थाटात निघते. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असताना परंपरेप्रमाणे भाविक खांद्यावरून लाकडी मंचकासह श्री गणेशमूर्ती जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी घेऊन जातात.
जड अंतकरणाने निरोप
ढोल ताशांच्या गजरात निघत असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत बच्चे कंपनी बरोबरच महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा असाच असतो. गणेशोत्सवाचे हे मंतरलेले अकरा दिवस पुन्हा पुढच्यावर्षीच अनुभवता येणार असल्याने जड अंत:करणाने 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी करीत गणरायाला निरोप दिला जातो.


थाटात विसर्जन मिरवणूक
टेंबवाडीवासीयांबरोबरच शहरातील अनेक भाविक या गणपतीच्या सेवेत आपले योगदान दरवर्षी देत असतात. त्यामुळे हा बालगोपाळांचा गणपती म्हणूनही ओळखला जातो. मोठ्या लाकडी मंचकावर विराजमान झालेल्या या गणरायाची विसर्जन मिरवणूकही थाटात निघते. वाहतुकीची अनेक साधने उपलब्ध असताना परंपरेप्रमाणे भाविक खांद्यावरून लाकडी मंचकासह श्री गणेशमूर्ती जानवली नदीवरील गणपती सान्यावर विसर्जनासाठी घेऊन जातात.
जड अंतकरणाने निरोप
ढोल ताशांच्या गजरात निघत असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत बच्चे कंपनी बरोबरच महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. या सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा असाच असतो. गणेशोत्सवाचे हे मंतरलेले अकरा दिवस पुन्हा पुढच्यावर्षीच अनुभवता येणार असल्याने जड अंत:करणाने 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी करीत गणरायाला निरोप दिला जातो.

Web Title: Santakarta Ganesha of Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.