युतीने रत्नागिरीची घाण केली --नीलेश राणे :

By admin | Published: November 14, 2016 11:51 PM2016-11-14T23:51:55+5:302016-11-15T00:28:45+5:30

थेट संवाद:-- आता सर्वसामान्य लोकच युतीला कंटाळले, चिपळुणात राष्ट्रवादीशी आघाडी झाली नाही तेच चांगले

Rani has dug up Ratnagiri - Nilesh Rane: | युतीने रत्नागिरीची घाण केली --नीलेश राणे :

युतीने रत्नागिरीची घाण केली --नीलेश राणे :

Next

मनोज मुळ्ये-- रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा आहे. निसर्गाने या शहराला भरभरून देणे दिले आहे. मात्र, शिवसेना-भाजप युतीने आपल्या सत्तेच्या काळात रत्नागिरी शहराची घाण केली आहे, असा सणसणीत आरोप काँग्रेसचे माजी खासदार तसेच प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी केला आहे. चिपळुणात राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही, ही बाब काँग्रेसच्या पथ्यावरच पडली आहे, असे सांगताना त्यांनी राष्ट्रवादीच्या चिपळुणातील काही नेत्यांवर हल्लाबोलच केला.
रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीन नगर परिषदांच्या निवडणुकीत नीलेश राणे यांनी विशेष लक्ष घातले आहे. या तीनही ठिकाणी उमेदवार निवडीसह प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी या भागांमध्ये सातत्याने दौरा सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला मुलाखत देताना त्यांनी शिवसेना, भाजप तसेच चिपळुणातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार प्रहार केला.
रत्नागिरी आणि राजापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. रत्नागिरीमध्ये काँग्रेसने सहा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस २४ जागांवर निवडणूक लढवत आहे. राजापुरात काँग्रेस अधिक सक्षम असल्यामुळे तेथे १४ जागांवर काँग्रेस आणि ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. आघाडीमध्ये रत्नागिरीत नगराध्यक्षपदाची संधी राष्ट्रवादीला देण्यात आली आहे आणि राजापुरात काँग्रेस उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरला आहे, असेही त्यांनी सांगितले.
चिपळुणात राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांची गणिते फारच वेगळी आहेत. त्यामुळे तेथे आघाडी झाली नाही, हीच बाब काँग्रेससाठी सकारात्मक आहे, असा टोला राणे यांनी हाणला.
रत्नागिरीमध्ये शिवसेना -भाजपला सत्ता देऊन आपण फसलो आहोत, अशी आता लोकांचीच भावना झाली आहे. पाच वर्षात कोणतीही कामे झाली नाहीत. खरे तर रत्नागिरी शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बाहेर रत्नागिरी शहराबद्दलची समज वेगळी आहे. रत्नागिरी शहराकडे आदराने पाहिले जाते. रत्नागिरी हे निसर्गसमृद्ध शहर आहे. मात्र या शहराचे सौंदर्य वाढवणे युतीच्या सत्ताधिकाऱ्यांना जमले नाहीच, उलट त्यांनी प्रश्न वाढवून ठेवले आहेत. आरोग्य, पाणी, कचरा यासह अनेक प्रश्न जैसे थे आहेत. पाण्यासारख्या विषयात राजकारण केले जात आहे. अशाने लोकांचे प्रश्न सुटणार कसे आणि कधी सुटणार, असे प्रश्न त्यांनी केले. त्यासाठीच मतदारांनी चांगल्या लोकांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजापुरात काँग्रेस सक्षम आहे. तेथे मावळत्या नगर परिषदेत सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आहेत. पण त्यात गट तट आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी त्याचा इन्कार केला. निवडणूक जाहीर झाली तेव्हा काही प्रमाणात नाराजीचा मुद्दा पुढे आला होता. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रसंग घडतात. पण शहरातील कोणाचाही राजीनामा पक्षाने मंजूर केलेला नाही. सर्वजण एकत्र येऊन एकदिलाने काम करत आहेत. त्यामुळे यावेळीच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला निर्विवाद सत्ता मिळेल, असा दावा त्यांनी केला.
युतीच्या नाकर्त्या कारभारामुळे यावेळी काँग्रेसला मोठी संधी आहे. कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे नगर परिषदांच्या या निवडणुकीत काँग्रेस दखलपात्र वाटा उचलेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)


आमदार, खासदार स्वत:मध्येच मश्गुल
कोणत्याही शहराच्या विकासाला जेवढा नगराध्यक्ष जबाबदार असतो, तेवढीच जबाबदारी स्थानिक आमदाराचीही असते. त्यात खासदारानेही लक्ष घालणे अपेक्षित असते. पण, त्याबाबत रत्नागिरी दुर्दैवी आहे. रत्नागिरीचे खासदार कधी दिसतच नाहीत आणि रत्नागिरीचे आमदार मंत्रीपदासाठी फिरत बसलेत. शिवसेना-भाजप युतीच्या काळात कोणतेच उल्लेखनीय काम झालेले नाही. सर्वांच्या महामार्गाचा प्रश्न तसाच पडून आहे. नुसत्या घोषणा केल्या जातात. महामार्गाचा आणि नगर परिषद निवडणुकीचा थेट संबंध नसला तरी त्यामुळे लोकांमध्ये युती सरकारबाबतची जी नाराजी आहे, ती या निवडणुकीत स्पष्टपणे दिसणार आहे. आमदारांना मंत्रीपद हवंय, पण त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. मुख्यमंत्र्यांना आणणार, अशा वल्गना भाजपवाले करतात, पण रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शहरात घेऊन येणे भाजपवाल्यांना शक्य होत नाही. यातील कोणाचीही विकासकामे करण्याची पतच नाही. स्वत:मध्येच मश्गुल असलेले आमदार-खासदार लोकांचे प्रश्न काय सोडवणार, अशी सणसणीत टीका नीलेश राणे यांनी केली.


चिपळुणात राष्ट्रवादीमुळे फरफटच झाली
चिपळुणात गतवेळी काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. उपनगराध्यक्षपदही काँग्रेसला मिळाले. पण, काँग्रेसला कामाची संधीच मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांमुळे काँग्रेसची फरफट झाली. त्यामुळे आता आघाडी झाली नाही तेच अधिक चांगले आहे. राष्ट्रवादीने केलेल्या चुकांचा, हुकुमशाहीचा त्रास काँग्रेसला झाला असता. राष्ट्रवादीच्या एकाच नेत्याबाबत नाराजी आहे. तोच राष्ट्रवादी संपवत आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासोबत नाही, हे आमच्या पथ्यावरच पडले आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या चांगल्या कामांचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. त्यामुळे तेथे काँग्रेसला स्वबळावरही चांगले यश मिळेल, असे ते म्हणाले.
नगरसेवकांवर सकारात्मक नियंत्रण
नगर परिषदांकडे स्वत:चा निधी मर्यादित असतो. शहर विकासासाठी राज्य सरकारच्या विविध योजनांमधून निधी आणावा लागतो. असा निधी आणण्याची क्षमता काँग्रेसकडे आहे. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसला संधी द्यावी, असे आवाहन नीलेश राणे यांनी केले. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर नियंत्रणही ठेवले गेले पाहिजे. एखादा नगरसेवक आपली जबाबदारी नीट पार पाडत नसेल, तो काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्याला थांबवण्याची, सुधारण्याची जबाबदारी पक्षाची आहे. पक्षाने अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवायला हवे. आताच्या निवडणुकीत उमेदवारी देतानाच आपण ही बाब आपल्या पक्षाच्या उमेदवारांना सांगितली आहे. चुकीच्या गोष्टी घडू नयेत, यासाठी या नगरसेवकांवर आपले ठाम नियंत्रण असेल, असे राणे यांनी सांगितले. अनेक पक्षांचे आपल्या नगरसेवकांवर नियंत्रण नाही. त्यामुळेच विकास कामांवर पक्षांची छाप पडत नाही. काँग्रेसमध्ये मात्र तशी स्थिती नसेल. नगरसेवकांनी रचनात्मक कामे करावीत, याकडे पक्ष लक्ष देईल. या गोष्टीचाही मतदारांनी आवर्जून विचार करावा. नगरसेवकांवर नियंत्रण असलेल्या पक्षाच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Rani has dug up Ratnagiri - Nilesh Rane:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.